
Vidhan Parishad Election 2026 : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी पाच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली. या निवडीत नव्या चेहऱ्यांसोबतच पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनाही संधी देत भाजपने संघटनात्मक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडीमुळे आगामी राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भाजपने सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार या पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याआधी पक्षाने 30 आणि नंतर 14 इच्छुकांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. त्यातून अंतिम निवड करण्यात आली.
यंदाच्या निवडीत भाजपने संघटनेत काम करणाऱ्या आणि दीर्घकाळ पक्षाशी जोडलेल्या नेत्यांना संधी देण्यावर भर दिला आहे. अलीकडच्या काळात ‘आयाराम’ना प्राधान्य दिल्याचा आरोप होत असताना, या निर्णयातून पक्षाने आपला संदेश स्पष्ट केला आहे.
भाजपने उमेदवारांची निवड करताना जातीय आणि सामाजिक संतुलन राखले आहे. ओबीसी, मराठा, ब्राह्मण, अनुसूचित जाती आणि महिलांना प्रतिनिधित्व देत व्यापक सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
या निवडीत भाजपने जाणीवपूर्वक मुंबईतील उमेदवारांना वगळून इतर भागांना प्राधान्य दिले. अहिल्यानगर, कोकण, नागपूर, ठाणे आणि मराठवाडा या भागांतील प्रतिनिधित्वातून प्रादेशिक संतुलन साधण्यात आले आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी संधी मिळणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्य स्पर्धा उर्वरित पाच जागांवर केंद्रित आहे.
कोकणातील उमेदवार प्रमोद जठार यांनी प्रतिक्रिया देताना पक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “पक्ष योग्य वेळी संधी देतो,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक संदेश दिला.