
कलियुगाच्या समाप्तीबाबत आणि भगवान विष्णूंच्या कल्की अवताराबाबतच्या भविष्यवाण्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. गरुड पुराण, विष्णू पुराण आणि कल्की पुराणात कलियुगाच्या अखेरीस धर्माचा ऱ्हास, नैतिक मूल्यांचे पतन आणि समाजातील वाढती अराजकता यांचा उल्लेख आढळतो. या भविष्यवाण्यांमुळे अनेक जण भविष्यातील बदलांविषयी उत्सुकता व्यक्त करत आहेत.
कलियुगात धर्मापेक्षा संपत्तीला महत्त्व? विष्णू पुराणातील वर्णनानुसार कलियुगात व्यक्तीची ओळख त्याच्या सदाचाराने नव्हे तर संपत्ती, सत्ता आणि प्रभावाने ठरेल. समाजात नैतिक मूल्यांपेक्षा भौतिक यशाला अधिक महत्त्व दिले जाईल. धार्मिकतेच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढेल, असेही काही उल्लेखांमध्ये सांगितले आहे.
काही पुराणांतील भविष्यवाण्यांनुसार कलियुग जसजसे पुढे सरकेल तसतसे मानवाचे आयुर्मान, शारीरिक क्षमता आणि आरोग्य यामध्ये घट होईल. मानवी जीवनशैली अधिक तणावपूर्ण होईल आणि समाजात असंतुलन वाढेल, असे संकेत दिले गेले आहेत.
गरुड पुराण आणि कल्की पुराणात भगवान विष्णूंचा दहावा अवतार म्हणजे कल्की अवतार असल्याचे म्हटले आहे. हा अवतार कलियुगाच्या शेवटी प्रकट होईल आणि अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करेल. कल्की पांढऱ्या घोड्यावर आरूढ असतील आणि त्यांच्या हातात दिव्य तलवार असेल, असे वर्णन पुराणांमध्ये आढळते.
कल्की पुराणातील कथेनुसार कल्की अवताराचा जन्म शंभल नावाच्या गावात विष्णुयश आणि सुमती यांच्या घरी होईल. त्यांना वेद, शास्त्र आणि युद्धकलेचे शिक्षण मिळेल. त्यानंतर ते अधर्माविरुद्ध संघर्ष करून नवीन युगाची सुरुवात करतील, असे वर्णन आढळते.
कलियुगाच्या समाप्तीबाबत विविध मते आणि अनेक दावे सोशल मीडियावर वेळोवेळी समोर येत असले तरी पुराणांतील या भविष्यवाण्या प्रामुख्याने धार्मिक श्रद्धा आणि आध्यात्मिक विचारांशी संबंधित आहेत. त्यांना ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक पुरावा नसला तरी हिंदू धर्मग्रंथांतील या कथांनी आजही अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण केले आहे.