भूक लागल्यावर किंवा पोट रिकामं असताना आतून गुडगुड आवाज येतो. पण हा आवाज येतो तरी का? यामागे नेमकं काय कारण आहे? हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे का? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पोटातून गुडगुड आवाज येणं ही एक सामान्य गोष्ट आहे, विशेषतः भूक लागल्यावर असं होतं. पण पचनक्रिया आणि आतड्यांच्या हालचालीमुळेही हा आवाज येऊ शकतो. कधीकधी तर हा आवाज इतका मोठा असतो की बाजूच्या व्यक्तीलाही ऐकू येतो. आपल्या पचनसंस्थेची ही एक नैसर्गिक क्रिया आहे. यामागे काय कारणं आहेत आणि त्यावर काय उपाय करता येतील, ते आपण जाणून घेऊया.
26
पोटात गुडगुड आवाज का येतो?
आपली पचनसंस्था, म्हणजे पोट आणि आतडी, सतत काम करत असतात. पोटात अन्न असताना, पचनक्रियेदरम्यान स्नायू अन्न आणि द्रव पुढे ढकलतात. या प्रक्रियेला 'पेरिस्टॅलिसिस' (peristalsis) म्हणतात. पोट रिकामं असतानाही पचनसंस्था पूर्णपणे शांत नसते. पोट आणि लहान आतड्याचे स्नायू ठराविक वेळेनंतर आकुंचन पावतात, ज्यामुळे गॅस आणि द्रव आतड्यांमधून पुढे सरकतात. याच हालचालीमुळे तो गुडगुड आवाज येतो.
36
रिकाम्या पोटी आवाज जास्त स्पष्ट ऐकू येतो
पोट रिकामं असतं, तेव्हा आतमध्ये आवाज दाबण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कोणताही अन्नपदार्थ नसतो. त्यामुळे, आतड्यांच्या हालचालीचा आवाज जास्त स्पष्ट ऐकू येतो. भूक लागल्यावर शरीरात काही हार्मोनल बदलही होतात, ज्यामुळे पचनसंस्थेची क्रिया अधिक सक्रिय होते. यामुळेच काही लोकांना रिकाम्या पोटी पोटात जास्त हालचाल जाणवते.
पोटात गुडगुड आवाज येण्यामागे गॅस हे एक महत्त्वाचं कारण आहे. जेवताना किंवा पाणी पिताना हवा गिळल्यास किंवा खूप वेगाने खाल्ल्यास पोटात गॅस तयार होतो. काही विशिष्ट पदार्थ खाल्ल्यामुळेही पोट आणि आतड्यांमध्ये वायूचं प्रमाण वाढतं. हा गॅस आतड्यांमधून जाताना आवाज निर्माण करतो. याशिवाय, बद्धकोष्ठता, अपचन किंवा आहारात अचानक बदल झाल्यासही पोटातून आवाज येतो.
56
हे चिंतेचे कारण कधी बनते?
सहसा पोटातून गुडगुड आवाज येणं ही चिंतेची बाब नाही. पण, जर हा आवाज सतत येत असेल आणि त्यासोबत पोटात तीव्र वेदना, सतत उलट्या किंवा जुलाब होत असतील, तर हे एखाद्या आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतं. विशेषतः, आवाजासोबत तीव्र वेदना किंवा शौचास त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
66
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
नेहमी हळू जेवा आणि अन्न चावून खा.
शरीर हायड्रेटेड ठेवा, यासाठी नियमितपणे पाणी प्या.
जास्त वेळ उपाशी राहू नका आणि संतुलित आहार घ्या.
निरोगी शरीरासाठी सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा.
कोणतीही गंभीर लक्षणं दिसल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.