
उन्हाळ्याच्या दिवसांत किचनमधून निघणारी फळं, भाज्या आणि अंड्यांची सालं आपण बहुतेक वेळा कचरा समजून फेकून देतो. पण खरं तर हाच कचरा तुमच्या बागेतील मातीला अधिक सुपीक बनवण्याचा एक सोपा आणि स्मार्ट मार्ग आहे. या नैसर्गिक गोष्टींमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि ऑरगॅनिक घटक भरपूर प्रमाणात असतात. हे घटक मातीचा दर्जा सुधारतात आणि झाडांच्या वाढीला मदत करतात. जर याचा योग्य वापर केला, तर घरातील कुंड्यांमधील आणि किचन गार्डनची माती जास्त सुपीक होऊ शकते आणि झाडंही भराभर वाढू शकतात.
केळी, पपई, टरबूज, आंबा आणि सफरचंद यांसारख्या फळांच्या सालींमध्ये अनेक पोषक तत्वं असतात. या साली थेट मातीत टाकण्याऐवजी त्यांचे लहान तुकडे करा. आता एका डब्यात किंवा बादलीत सुकी पानं, थोडी कोरडी माती टाका आणि त्यात या साली टाकून झाकून ठेवा. काही दिवसांतच याचं कंपोस्ट खत तयार होईल. हे खत मातीत मिसळल्यामुळे झाडांना नैसर्गिक पोषण मिळतं आणि मातीही अधिक भुसभुशीत राहते.
बटाटा, दुधी, टोमॅटो, गाजर, काकडी आणि भोपळा यांसारख्या भाज्यांच्या सालीसुद्धा बागकामासाठी खूप उपयोगी आहेत. या साली उन्हात थोड्या वाळवून तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता किंवा कंपोस्ट खड्ड्यात टाकू शकता. भाज्यांच्या कचऱ्यापासून तयार झालेलं खत मातीतील ऑरगॅनिक मॅटर वाढवतं. यामुळे मातीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो आणि झाडांच्या मुळांना चांगलं वातावरण मिळतं.
अंड्यांच्या सालींमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, जे झाडांसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. सगळ्यात आधी अंड्याची सालं स्वच्छ धुऊन उन्हात वाळवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये त्यांची बारीक पावडर बनवा. ही पावडर कुंडीतील मातीत मिसळल्यास झाडांना अतिरिक्त कॅल्शियम मिळतं. विशेषतः टोमॅटो, मिरची आणि फुलझाडांसाठी हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो.
जर तुम्हाला माती अधिक सुपीक बनवायची असेल, तर तुम्ही 'लेयरिंग टेक्निक' वापरू शकता. यासाठी कुंडीत किंवा खड्ड्यात सर्वात खाली सुकी पानं टाका, त्यानंतर फळं आणि भाज्यांच्या साली टाका. त्यावर थोडी माती आणि पुन्हा सुक्या कचऱ्याचा थर लावा. काही काळानंतर हे मिश्रण हळूहळू मातीत मिसळून पोषक तत्वांनी भरलेल्या खताचं रूप घेतं. यामुळे मातीचा दर्जा सुधारतो आणि झाडांच्या वाढीला मदत मिळते. उन्हाळ्यात मातीतील ओलावा टिकवून ठेवण्याचा हा एक स्मार्ट मार्ग आहे. कारण कडक उन्हात माती लवकर कोरडी होते, त्यामुळे किचन वेस्ट कंपोस्ट मातीच्या वरच्या थरात हलक्या हाताने मिसळल्यास ओलावा जास्त काळ टिकून राहतो.