मांजर आडवं गेलं की अनेकजण जागेवरच थांबतात. काहीजण तर थोडा वेळ थांबून, पाणी पिऊन मगच पुढे निघतात. टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली असली तरी आजही ही गोष्ट अनेकजण पाळतात. पण मांजर आडवं जाणं अशुभ मानण्यामागची ही समजूत नक्की आली कुठून, तुम्हाला माहित आहे का?
एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडल्यावर मांजर आडवं गेलं की अनेकजण अशुभ मानतात. ते प्रवासाला लगेच पुढे न जाता काही वेळ थांबतात. काही जण तर पाणी पिऊन किंवा बसून उठून मगच पुढे निघतात. पण ही प्रथा अंधश्रद्धेतून नाही, तर जुन्या काळातील परिस्थिती आणि प्रवासातील धोके लक्षात घेऊन, एक खबरदारी म्हणून सुरू झाली होती, असं म्हटलं जातं.
25
पूर्वीचा प्रवास सोपा नव्हता
पूर्वीच्या काळी आजच्यासारख्या कार, बस किंवा रेल्वे नव्हत्या. मोठे रस्ते आणि रस्त्यांवर दिवेही नव्हते. बहुतेक लोक जंगले, झाडीझुडपे असलेल्या मार्गांवरून पायी किंवा बैलगाडीने प्रवास करायचे. विशेषतः निर्जन ठिकाणी प्रवास करणे खूप धोकादायक होते. जंगली प्राणी, विषारी साप किंवा इतर धोके कधी समोर येतील, हे सांगता येत नसे. त्यामुळे प्रवास करताना आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवून सतर्क राहणं गरजेचं होतं.
35
मांजराची सतर्कता हेच कारण होतं का?
मांजरं खूप सतर्क प्राणी आहेत. लहानसा आवाजही ती पटकन ओळखतात. स्वतःला धोका आहे असं वाटल्यास ती लगेच प्रतिक्रिया देतात. आजूबाजूला एखाद्या मोठ्या प्राण्याची चाहूल लागल्यास त्यांच्या वागण्यात बदल दिसतो. जुन्या काळातील लोक त्यांच्या याच गुणाचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचे, असं म्हणतात. मांजर शांतपणे न चालता अचानक घाबरून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला पळत सुटलं, तर जवळपास एखादा धोकादायक प्राणी असावा, असा अंदाज लोक बांधायचे.
45
मांजराचं वागणं धोक्याचा इशारा?
जंगल किंवा निर्जन रस्त्यावरून प्रवास करताना मांजर अचानक पळत सुटण्यामागे काहीतरी कारण असावं, असं जुन्या लोकांना वाटायचं. तिथे एखादा मोठा शिकारी प्राणी किंवा साप असण्याची शक्यता ते गृहीत धरायचे. म्हणूनच, मांजर आडवं गेलं की ते लगेच पुढे न जाता थोडा वेळ थांबायचे. गरज वाटल्यास बैलगाडीतून उतरून आजूबाजूची परिस्थिती तपासायचे. रस्ता सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावरच ते पुन्हा पुढे जायचे. म्हणजे हा निर्णय भीतीपोटी नाही, तर सतर्कतेतून घेतलेली खबरदारी होती.
55
खबरदारीची सवय अंधश्रद्धा कशी झाली?
काळ बदलला आणि प्रवासाच्या पद्धतीही पूर्णपणे बदलल्या. जंगलातून प्रवास करणं कमी झालं. रस्ते, वाहनं आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध झाल्या. पण मांजर आडवं गेल्यास थांबण्याची प्रथा मात्र तशीच राहिली. हळूहळू या प्रथेमागील खरं कारण लोक विसरून गेले. त्यामुळे मांजर आडवं गेल्यास काहीतरी वाईट घडतं, हा समज अधिक घट्ट झाला. अशाप्रकारे, एकेकाळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पाळली जाणारी खबरदारी, काळाच्या ओघात 'अशुभ' मानली जाऊ लागली. यामागे कोणताही शास्त्रीय आधार नाही, पण जुन्या काळातील परिस्थितीनुसार प्राण्यांच्या वागणुकीवरून धोके ओळखण्याची ती एक पद्धत होती, जी नंतर अंधश्रद्धा बनली असावी.
सूचना - ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे दिली आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, याची वाचकांनी नोंद घ्यावी.