
Adhik Maas Rituals : हिंदू धर्मात अधिकमासाला अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानले जाते. भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या या महिन्यात उपासना, दानधर्म, धार्मिक विधी आणि पारंपरिक संस्कारांना विशेष महत्त्व प्राप्त होते. अधिकमास म्हटलं की जावयाचं जेवण, धोंड्याचा महिना अशा परंपरा डोळ्यासमोर येतात. मात्र, या महिन्यातील आणखी एक महत्त्वाची आणि भावनिक परंपरा म्हणजे विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरणे. ही परंपरा केवळ धार्मिक नसून आईबद्दल कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करणारी मानली जाते.
अधिकमासात दान-पुण्याला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू संस्कृतीत आईला देवतुल्य स्थान दिले गेले आहे. “स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी” ही म्हण आईच्या महानत्वाची जाणीव करून देते. आई आपल्या मुलांना जन्म देते, त्यांचे संगोपन करते आणि आयुष्यभर त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करत राहते.
असे मानले जाते की, मुलाला जन्म देताना आईचा देखील एक नवा जन्म होतो. त्यामुळे आईचे ऋण फेडण्यासाठी आणि तिच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी अधिकमासात मुलगी आईची ओटी भरते. या विधीमुळे मुलीच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य लाभते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
अधिकमास हा केवळ धार्मिक विधींचाच नाही तर पारंपरिक संस्कृती जपण्याचाही महिना मानला जातो. अनेक घरांमध्ये या काळात विशेष पूजा, व्रत, जप आणि दानधर्म केले जातात. आईची ओटी भरण्याची परंपरा ही कौटुंबिक नात्यांना अधिक दृढ करणारी आणि संस्कार जपणारी मानली जाते.
आजच्या आधुनिक जीवनशैलीत अनेक पारंपरिक प्रथा मागे पडताना दिसतात. मात्र, अधिकमासात आईची ओटी भरण्याची प्रथा अजूनही अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने पाळली जाते.
आईची ओटी भरताना काही पारंपरिक वस्तूंना विशेष महत्त्व दिले जाते. सर्वप्रथम खण, ब्लाऊजपीस किंवा साडी-चोळी घ्यावी. त्यावर अक्षता टाकून हळद-कुंकू लावावे. त्यानंतर नारळ, हळकुंड, खारीक, बदाम किंवा पाच प्रकारची फळे ओटीमध्ये ठेवली जातात.ही ओटी आईच्या पदरात घालून तिला नमस्कार केला जातो. ओटीतील प्रत्येक वस्तू सौभाग्य, समृद्धी, मांगल्य आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे हा विधी करताना या वस्तूंचा समावेश आवर्जून केला जातो.
आईची ओटी भरण्याची परंपरा ही केवळ धार्मिक विधी नसून आईप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर संस्कार आहे. अधिकमासाच्या निमित्ताने आईला मान देत तिचे आशीर्वाद घेण्यामागे कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ करण्याची भावना दडलेली असते. अशा परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आणि संस्कृतीचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही धर्मशास्त्रात सांगितले जाते.