
Female Auto Driver Viral Story: चांगली नोकरी, मोठा पगार आणि कॉर्पोरेट ओळख... आजकाल सगळेच याच्या मागे धावताना दिसतात. पण एका महिलेची गोष्ट सोशल मीडियावर लोकांना वेगळा विचार करायला लावत आहे. तब्बल ९ वर्षं आयटी सेक्टरमध्ये मॅनेजर म्हणून काम केलेल्या या महिलेनं अचानक नोकरी सोडली आणि चक्क ऑटो-रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती तिच्या या निर्णयामुळे खूप खूश आहे आणि दर महिन्याला सुमारे ६० हजार रुपये कमावतेय. तिची ही कहाणी आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, हजारो लोक यालाच खरं यश म्हणत आहेत.
ही इंटरेस्टिंग गोष्ट तेव्हा समोर आली, जेव्हा एका स्टार्टअप फाउंडरची भेट एका महिला रिक्षाचालकाशी झाली. बोलता-बोलता त्या फाउंडरने विचारलं की, पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या या व्यवसायात काम करण्याचा अनुभव कसा आहे? यावर त्या महिलेनं दिलेलं उत्तर ऐकून त्या स्वतःच हैराण झाल्या. महिलेनं सांगितलं की, ती आधी जवळपास ९ वर्षं एका आयटी कंपनीत मॅनेजर पदावर काम करत होती. चांगली नोकरी, जबाबदारीचं पद आणि स्थिर करिअर असूनही तिनं हे सगळं सोडण्याचा निर्णय घेतला.
त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, आयटी सेक्टरमधला वाढता दबाव, टार्गेट्स, ताणतणाव आणि कामाचा बोजा तिच्या आयुष्यावर परिणाम करत होता. बराच काळ या वातावरणात काम केल्यानंतर तिला जाणवलं की पैसा आणि पद हेच सर्वकाही नाही. याच कारणामुळे तिनं कॉर्पोरेट जगाला रामराम ठोकला आणि स्वतःची रिक्षा विकत घेऊन ती चालवायला सुरुवात केली. सगळ्यात विशेष म्हणजे, तिनं हा बदल मजबुरीनं नाही, तर स्वतःच्या आनंदासाठी निवडला.
महिलेने सांगितले की, ती रिक्षा चालवून दर महिन्याला जवळपास ६० हजार रुपयांपर्यंत कमावते. पण तिच्या कहाणीतला सगळ्यात मोठा भाग कमाई नाही, तर तिचं समाधान आहे. तिच्या मते, आता तिच्या आयुष्यात पूर्वीसारखा ताण नाही. ती तिच्या वेळेची मालक आहे, स्वतःच्या मर्जीप्रमाणे काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ती पूर्वीपेक्षा खूप जास्त आनंदी आहे.
ही कहाणी सोशल मीडियावर समोर येताच लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेक युझर्स म्हणाले की, आजच्या कॉर्पोरेट लाईफमध्ये मानसिक ताण इतका वाढला आहे की, लोक आता काम आणि आयुष्य यांच्यातल्या संतुलनाला जास्त महत्त्व देऊ लागले आहेत. एका युझरने तर गंमतीत लिहिलं की, 'आयटी इंडस्ट्रीत १८ वर्षं घालवल्यानंतर आता मी मीटिंग्स, रात्रीचे कॉल्स आणि अचानक येणाऱ्या समस्या हाताळण्यात एक्सपर्ट झालोय.' तर अनेक लोकांनी त्या महिलेच्या निर्णयाचं कौतुक करत म्हटलं आहे की, आयुष्यातलं खरं यश तेच आहे, जिथे माणूस मानसिकदृष्ट्या समाधानी आणि आनंदी असतो.