
Danish woman India travel: भारतातील अनेक तरुण परदेशात सेटल होण्याचं स्वप्न पाहतात. पण डॅनमार्कची अॅस्ट्रिड एस्मेराल्डा हिने अगदी उलट निर्णय घेतला आहे आणि तोही तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरल्याचं ती म्हणते. कोपनहेगनमधील नोकरी, घर आणि मित्रमंडळी हे सगळं मागे टाकून अॅस्ट्रिडने भारतात यायचं ठरवलं आणि मागच्या दहा महिन्यांपासून ती देशाच्या विविध भागांचा अनुभव घेत आहे. तिने ऋषिकेश, गोवा, मुंबई यांसारख्या शहरांत वेळ घालवला आणि या देशातील विविधता, संस्कृती आणि निसर्गाच्या सौंदर्यावर प्रेम केलं.
अॅस्ट्रिड सांगते, “माझं आयुष्य चांगलं होतं. चांगली नोकरी, सुंदर घर, उत्तम मित्र... पण तरी काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. कोपनहेगन फक्त उन्हाळ्यात मजा वाटायचं, उरलेला वेळ आपण केवळ उन्हाळ्याची वाट बघत असतो. सारं शहरच झोपलेलं वाटायचं." ती पुढे म्हणते, “मला बदल हवा होता. मी माझं सगळं विकून भारतात आले. कुठलाही ठराविक प्लॅन नव्हता, भीती नव्हती आणि आज मला कोणत्याही गोष्टीचं दुःख नाही."
भारताने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आहे. अॅस्ट्रिड म्हणते, “इथे आल्यावर मला जाणवलं की आयुष्यात अजून किती काही बाकी आहे. या देशाने माझी स्वप्नं पुन्हा जागी केली, माझा आत्मविश्वास वाढवला आणि कर्माच्या शक्तीचा अनुभव दिला." ती पुढे म्हणते, “भारत इतका विविधतेने भरलेला आणि सुंदर आहे की मी या देशाच्या प्रेमातच पडले आहे. इथली संस्कृती, लोक आणि निसर्ग सगळंच अप्रतिम आहे!"
भारतात येण्यापूर्वी अॅस्ट्रिड चिंतेत होती. काही लोकांनी तिला सुरक्षिततेविषयी इशारे दिले होते, पण तिला भारतात आल्यावर वेगळाच अनुभव मिळाला. ती म्हणते, “माझ्या अपेक्षेपेक्षा इथलं वातावरण खूप सकारात्मक आहे. मी एकटी असूनही इथं फार सुरक्षित वाटलं."
अॅस्ट्रिडने तिचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केल्यावर ती झपाट्याने व्हायरल झाली. अनेकांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं, काहींनी भारतातील उकाड्याबद्दल विनोदाने प्रतिक्रिया दिली, तर काहींनी भारतातील राहणीमानाविषयी मिक्स भावना व्यक्त केल्या.
तिने एका कॉमेंटमध्ये कबूल केलं की युरोपियन पासपोर्टमुळे तिला जगात कुठेही प्रवास करायला सुलभता आहे. जी अनेक भारतीयांना मिळत नाही. ती म्हणते, “हे खूप खंतजनक आहे की भारतातील अनेकांना स्वतःच्या देशातसुद्धा फिरणं परवडत नाही. मला हा विशेषाधिकार मिळाला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, आणि मी त्याबद्दल आभारी आहे."
अॅस्ट्रिड सध्या भारतात तिचा शेवटचा महिना घालवत आहे. नंतर ती युरोपमध्ये थोडा वेळ फिरणार आहे, पण तिचं मन भारतातच अडकून पडलं आहे. ती म्हणते, “पावसाळ्यानंतर मी परत भारतात येणार आहे. तुम्ही भारतात प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर उगाच विचार करू नका निघा! हे आयुष्य बदलणारं ठरेल!"