
नवी दिल्ली : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या पुरात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल मोदींनी दुःख व्यक्त केलं. या कठीण काळात भारतातील जनता नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींच्या पाठीशी उभी आहे, असं मोदी म्हणाले. भारताकडून नेपाळला सर्व प्रकारची मदत दिली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, "या संकटकाळात भारतातील लोक नेपाळमधील आपल्या बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभे आहेत. भारत नेपाळला शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे. बचाव आणि मदतकार्यासाठी आमच्या टीम एकमेकांशी समन्वय साधून काम करत आहेत."
Spoke to Prime Minister Balendra Shah and conveyed condolences on the loss of lives due to the floods in Nepal. The people of India stand in solidarity with their sisters and brothers in Nepal at this difficult time.
India is ready to provide all possible humanitarian…— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2026
बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे उत्तर नेपाळमध्ये मोठी हानी झाली. रसुवा जिल्ह्यातील तिमूर आणि जवळच्या स्याफ्रुबेसी भागात पुराचा सर्वाधिक फटका बसला. आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर १०५ भारतीयांसह सुमारे ४०० जण बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये बहुतांश परदेशी नागरिक आहेत. कैलास मानसरोवर यात्रेला निघालेले काही भाविकही बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
या पुराच्या पाण्यात अनेक वाहनं आणि इमारती वाहून गेल्या आहेत. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बचावकार्यासाठी नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस यांची पथकं तैनात करण्यात आली आहेत.