
PM Modi Addresses Lok Sabha on West Asia Conflict Urges United Stand Against War नवी दिल्ली: पश्चिम आशियातील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत असून ही चिंतेची बाब आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अशा परिस्थितीत भारताने युद्धाविरोधात एकजूट दाखवून स्पष्ट संदेश देण्याची गरज आहे. आपण जगभरातील नेत्यांशी सतत संपर्कात आहोत, असंही मोदींनी लोकसभेत बोलताना सांगितलं. त्यांच्याआधी परराष्ट्र मंत्री आणि पेट्रोलियम मंत्र्यांनीही सभागृहात आपली बाजू मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्यसभेत या विषयावर बोलणार आहेत.
मोदी म्हणाले, "गेल्या तीन आठवड्यांपासून हे युद्ध सुरू आहे. याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य लोकांवर होत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हानं उभी राहिली आहेत. भारतासमोरही अनपेक्षित आव्हानं आहेत. ज्या भागात युद्ध सुरू आहे, तिथे भारताचे मोठे व्यापारी संबंध आहेत. भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा (क्रूड ऑइल) मोठा हिस्सा याच भागातून येतो. जवळपास १ कोटी भारतीय नागरिक या प्रदेशात राहतात. अनेक भारतीय जहाजांवरही काम करतात. त्यामुळे भारताने युद्धाविरोधात एकमताने संदेश दिला पाहिजे."
"मी राष्ट्रप्रमुखांशी दोन वेळा चर्चा केली आहे. काही लोकांचा जीव गेल्याची घटना दुःखद आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. तिथले भारतीय दूतावास आपल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करत आहेत. या संघर्षात भारतीयांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. आतापर्यंत ३,७५,००० भारतीय नागरिक सुखरूप मायदेशी परतले आहेत," असंही मोदींनी सांगितलं.
पंतप्रधानांनी इंधन सुरक्षेवरही माहिती दिली. ते म्हणाले, "होरमुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधनाच्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. आपण ६० टक्के एलपीजी आयात करतो आणि त्यात घरगुती वापराला आमचं प्राधान्य आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. भारताने ऊर्जा आयातीसाठी आधीच्या २७ देशांवर अवलंबून न राहता आता ४१ देशांपर्यंत आपले पर्याय वाढवले आहेत. देशाची पेट्रोलियम उत्पादनं साठवण्याची क्षमताही वाढवली आहे. आम्ही आणखी पुरवठादारांच्या संपर्कात आहोत. तेल, गॅस आणि रासायनिक खतं भारतात अधिक प्रमाणात कशी आणता येतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत," असं त्यांनी स्पष्ट केलं.