
दिल्लीतील टिकरी नेताजी सुभाष विहार परिसरात सोमवारी सकाळी एका वेअरहाऊसला (गोदामाला) आग लागल्याची मोठी घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दिल्ली अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांनी आगीची माहिती देणारा कॉल आला. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळाकडे रवाना करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण १५ गाड्या आग विझवण्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. आग जवळच्या इतर इमारतींमध्ये पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीच्या कारणाबद्दल अधिक तपशील मिळण्याची प्रतीक्षा आहे.
याआधी २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील कीर्ती नगरच्या लक्कर मंडीमध्ये एका प्लायवूडच्या वेअरहाऊस आणि जवळच्या दुकानांना आग लागली होती. त्यावेळीही अनेक स्टेशनवरून अग्निशमन दलाच्या ९ पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली होती. त्या घटनेतही कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
वेअरहाऊस आणि व्यावसायिक भागांमध्ये अनेकदा ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात साठवलेले असतात. त्यामुळे अशा ठिकाणी आग लागल्यास तातडीने प्रतिसाद देणं गरजेचं असतं. प्रशासन अशा घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.