
Mallikarjun Kharge Sparks Row : 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या अशिक्षित लोकांना कदाचित फसवले असेल, पण केरळच्या सुशिक्षित लोकांना ते असं फसवू शकत नाहीत,' असं वादग्रस्त विधान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी केलं आहे.
इथल्या एका निवडणूक रॅलीत बोलताना ते म्हणाले, 'केरळच्या लोकांना तुम्ही चुकीच्या मार्गावर नेऊ नका. ते खूप हुशार आणि सुशिक्षित आहेत. मोदीजी आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन, तुम्ही दोघे गुजरात किंवा इतर ठिकाणच्या अशिक्षित लोकांना फसवू शकता, पण केरळच्या लोकांना फसवणं तुम्हाला शक्य नाही.'
'मोदी आणि विजयन दोघेही एकाच मार्गावर चालले आहेत. ते ज्या पक्षांचं नेतृत्व करतात, ते सोडल्यास त्यांच्यात काहीच फरक नाही. मोदीच विजयन यांना नियंत्रित करत आहेत,' असा आरोपही त्यांनी केला.
खर्गेंच्या या विधानावर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी जोरदार टीका केली आहे. 'खर्गे यांनी पुन्हा एकदा गुजरात आणि उत्तर भारतातील लोकांविरोधात धक्कादायक विधान करून त्यांचा अपमान केला आहे. काँग्रेसला मत दिलं नाही म्हणून त्यांनी लोकांना अशिक्षित म्हटलं आहे. हे काँग्रेसचं 'फोडा आणि राज्य करा' धोरण दाखवतं. जेव्हा काँग्रेस निवडणूक हरते, तेव्हा ते लोकांचा अपमान करतात,' असं पूनावाला म्हणाले.