
पहलगाम - पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सर्वाधिक मराठी पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा काही दिवस होत नाही तोच महाराष्ट्रातील ७० वर्षीय पर्यटक महिलेवर हॉटेलमध्ये बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पहलगाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. संबंधित महिला काश्मिरच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी आली असताना हा दुःखद प्रसंग तिच्यासोबत घडला आहे.
काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी ही महिला पहलगामला गेली होती. मात्र, तिची ही सहल एक मोठ्या घटनेत बदलली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तिच्या हॉटेलच्या खोलीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. यात तिला गंभीर शारीरिक दुखापती झाल्या आहेत. हल्ल्यानंतर तिला खूप वेदना होत होत्या. तिला अनेक दिवस हालचाल करणेही शक्य नव्हते एवढ्या पाशवी पद्धतीने बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
आरोपी जुबेर अहमद या महिला पर्यटकाच्या खोलीत शिरला. त्यानंतर त्याने महिलेचे तोंड चादरीने बांधले. तिच्यावर चुकीचे कृत्य केले. त्यानंतर तो खोलीच्या खिडकीतून उडी मारून पळून गेला. ही घटना ११ एप्रिल रोजी घडली.
आरोपी हा पहलगामचा स्थानिक रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ६४ आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ जून रोजी अनंतनागच्या प्रधान सत्र न्यायाधीशांनी जुबेर अहमदला जामीन देण्यास नकार दिला. गुन्ह्याची गंभीरता, सुरू असलेली चौकशी आणि उपलब्ध पुरावे पाहता या टप्प्यावर जामीन देऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.
वृद्ध पर्यटक महिलेवर एवढ्या क्रूर पद्धतीने बलात्कार झाल्याने भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगामची प्रतिष्ठा मलीन झाली आहे, असे न्यायाधीशांनी नमूद केले आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की असे गुन्हे समाजाच्या नैतिक मूल्यांना धक्का पोहोचवतात. अशा कृत्यांमुळे निर्माण होणारी वेदना आणि भीती हिरवीगार शेते, पर्वत आणि नद्या झाकू शकत नाहीत, असे न्यायाधीशांनी म्हटले.
न्यायालयाने म्हटले आहे की, "या भूमीला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात. पण जर एका आदरणीय वृद्ध महिला येथे आली आणि तिला अशा क्रूरतेचा सामना करावा लागला, तर ती वेदना ती कायम सोबत घेऊन जाईल. हाच अनुभव ती आता आपल्यासोबत घेऊन जात आहे."
न्यायाधीशांनी असे गुन्हे थांबवण्यासाठी समाजाला पुढे येण्याचे आवाहन केले. काश्मीरची खरी ओळख जपण्यासाठी जागरूक नागरिक, मजबूत समाजसेवी संस्था आणि उदार लोकांनी एकत्र काम करायला हवे, असे ते म्हणाले.
या घटनेने स्थानिक लोकांना धक्का बसला आहे. या प्रदेशातील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अशा कृत्यांना शिक्षा न होता सोडू नये आणि न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे, असा न्यायालयाचा स्पष्ट संदेश होता.
पोलिस अजूनही पुरावे गोळा करत आहेत आणि तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई आणि निष्पक्ष खटल्याचे आश्वासन दिले आहे. खटला सुरु असताना आरोपी कोठडीतच राहील, असे सांगण्यात आले आहे.