
गौरीकुंड, रुद्रप्रयाग (उत्तराखंड) - उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात रविवारी सकाळी एक भीषण हेलिकॉप्टर अपघात झाला. केदारनाथ यात्रेवर निघालेल्या ७ भाविकांना घेऊन जाणारे आर्यन एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अपघातग्रस्त झाले. या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये केवळ २३ महिन्यांचा एक चिमुकलीचाही समावेश आहे. मृतदेह पूर्णपणे जळाल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, हे पर्यटक महाराष्ट्रातील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यात महाराष्ट्रातील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील आहेत.
हेलिकॉप्टर सकाळी गौरीकुंडहून केदारनाथच्या दिशेने निघाले होते. खराब हवामानामुळे नियंत्रण सुटल्यामुळे हेलिकॉप्टर जंगलात कोसळले, अशी प्राथमिक माहिती आहे. स्थानिक नेपाली महिलांनी घास कापताना आकाशातून धूर येताना पाहिले आणि मोठा आवाज ऐकून त्यांनी घटनेची माहिती प्रशासनाला दिली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदनसिंह रजवार आणि हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे यांनी दुर्घटनेची अधिकृत पुष्टी केली आहे.
या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये खालील सात जणांचा समावेश आहे:
राजकुमार जयसवाल (पती, महाराष्ट्र)
श्रद्धा जयसवाल (पत्नी, महाराष्ट्र)
काशी जयसवाल (२३ महिन्यांचा मुलगा, महाराष्ट्र)
तुष्टि सिंह
विनोद नेगी (स्थानिक रहिवासी)
विक्रमसिंह रावत (BKTC कर्मचारी)
कॅप्टन राजीव (पायलट)
हेलिकॉप्टर गौरी माई खर्क क्षेत्राच्या वरच्या भागात, घनदाट जंगलात कोसळले. प्रशासनाकडून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि मृतदेहांचे उर्वरित भाग व जळालेले अवशेष गोळा करण्याचे काम सुरू आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटर (एक्स) वर लिहिले:
"जनपद रुद्रप्रयाग मध्ये हेलिकॉप्टरच्या दुर्घटनाग्रस्त होण्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. SDRF, स्थानिक प्रशासन व अन्य बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत. बाबा केदारनाथ यांच्याच चरणी प्रार्थना आहे की यात्रेकरूंचे प्राण वाचवले जावेत."
७ जून – रुद्रप्रयाग-गौरीकुंड महामार्गावर आपत्कालीन लँडिंग:
क्रिस्टल एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरने बडासू हेलिपॅडवरून केदारनाथसाठी उड्डाण घेतले होते. मात्र, टेकऑफच्या क्षणी तांत्रिक बिघाड आल्यामुळे पायलटने महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केली. हेलिकॉप्टरचा टेल भाग कारवर आदळला आणि आजूबाजूच्या दुकानांचे नुकसान झाले. पायलटला पाठीवर दुखापत झाली, पण सर्व प्रवासी सुखरूप होते.
८ मे – उत्तरकाशी, गंगनानीजवळ हेलिकॉप्टर कोसळले:
एअरोट्रान्स कंपनीचे हेलिकॉप्टर गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावरील गंगनानी येथे कोसळले. या अपघातात पायलटसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. हे हेलिकॉप्टर सहस्त्रधाराहून हर्षिलकडे निघाले होते. मृतांमध्ये चार जण मुंबईचे, तर दोन आंध्र प्रदेशातील होते.
केदारनाथ व गंगोत्रीप्रमाणे अति उंचीवरील यात्रा मार्गांवर हेलिकॉप्टर ही प्रवासाची महत्त्वाची आणि जलद साधनं मानली जातात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून हवामानातील चढ-उतार, तांत्रिक बिघाड, व अनुभवहीनता यामुळे हेलिकॉप्टर अपघातांची मालिका वाढली आहे.
विशेषतः मे आणि जून महिन्यांमध्ये होणाऱ्या यात्रांच्या कालावधीत, हवामान अतिशय अस्थिर असते, जे हेलिकॉप्टर उड्डाणासाठी मोठा धोका ठरते. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.