
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने शनिवारी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. देशभरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल पुरेसं उपलब्ध आहे, असं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
लोकांनी बाटल्यांमध्ये किंवा इतर असुरक्षित भांड्यांमध्ये इंधन घेऊ नये किंवा साठवू नये, असं आवाहन मंत्रालयाने केलं आहे. कारण असं करणं खूप धोकादायक ठरू शकतं.
या सूचनेनुसार, पेट्रोल पंपांना इंधन देताना सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आदेश दिले आहेत.
या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना. पेट्रोल आणि डिझेल देशभरातील पेट्रोल पंपांवर पुरेसं उपलब्ध आहे. ग्राहकांनी बाटल्यांमध्ये किंवा अयोग्य भांड्यांमध्ये इंधन घेऊ नये किंवा साठवू नये, कारण यामुळे गंभीर सुरक्षेचा धोका निर्माण होतो.
याआधी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितलं की, पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात आव्हानं निर्माण झाली असली तरी, भारतात पेट्रोलियम उत्पादनांची कोणतीही टंचाई नाही.
शेखावत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. आपल्या काही शेजारी देशांमध्ये तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
"भारतात पेट्रोलियम उत्पादनांची कोणतीही टंचाई नाही... मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने सर्वच देशांसमोर आव्हान उभं केलं आहे. आपल्या शेजारी देशांबद्दल बोलायचं झाल्यास, पाकिस्तानमध्ये आणीबाणीसारखी स्थिती आहे, तर बांगलादेशात शाळा-कॉलेज बंद करण्यात आले आहेत," असं ते म्हणाले.
सरकारने ऊर्जा पुरवठा सुरक्षित ठेवण्यासाठी काय पावलं उचलली आहेत, याची माहितीही शेखावत यांनी दिली. ते म्हणाले की, भारताने कच्च्या तेलाच्या आयातीसाठी अनेक देशांशी करार केले आहेत. "आपण आधी एकूण २७ देशांकडून कच्चं तेल आयात करायचो; आता सरकारने ४० देशांसोबत आयातीचे करार केले आहेत. आम्ही पुरवठ्याचे मार्ग अधिक विस्तारले आहेत," असं त्यांनी स्पष्ट केलं. गॅस पुरवठ्यात काही प्रमाणात अडथळे आले असले तरी, तो सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने आवश्यक पावलं उचलली आहेत, असंही ते म्हणाले.
त्यांनी हेही सांगितलं की, पेट्रोलियम उत्पादनांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी नियम लागू करण्यात आले आहेत.
या परिस्थितीवरून काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना, ते या मुद्द्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
"काँग्रेसकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही, त्यामुळे ते यालाच मुद्दा बनवत आहेत," असं शेखावत म्हणाले.