
eight Dead in Indore After Drinking Contaminated Water : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पिण्याच्या पाण्यात सांडपाणी मिसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. शंभरहून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरच्या भागीरथपुरा परिसरात ही घटना घडली. महापालिकेने पुरवलेल्या पिण्याच्या पाण्यात ड्रेनेज पाईपमधील सांडपाणी मिसळल्याने ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. २५ डिसेंबरपासून पुरवठा होणाऱ्या पाण्याला विचित्र चव आणि वास येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती.
पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गळती झाल्याने सांडपाणी मिसळले होते. पाईपलाईनवर बेकायदेशीरपणे बांधलेल्या शौचालयातील घाण पिण्याच्या पाण्यात मिसळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या गंभीर चुकीमुळे विभागीय अधिकाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, एका उपअभियंत्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, सर्व बाधित रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशन यांसारख्या लक्षणांमुळे बहुतेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या शंभरहून अधिक लोक विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.