
Patna Fast Passenger Train Fire: बिहारमध्ये सोमवारी सकाळी रेल्वे स्टेशनवर मोठी धावपळ उडाली. सासाराम रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या पटना फास्ट पॅसेंजर ट्रेनच्या एका डब्याला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केलं आणि संपूर्ण डबा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात डब्याचं मोठं नुकसान झालं, पण सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे सुरक्षा दल (RPF), फायर ब्रिगेड आणि स्टेशनवरील लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे, आदल्याच दिवशी मध्य प्रदेशात धावत्या राजधानी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागल्याची घटना घडली होती. सलग दोन दिवस ट्रेनमध्ये आग लागण्याच्या घटनांमुळे प्रवाशांची चिंता वाढली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सासाराम रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ६ वर पटना फास्ट पॅसेंजर ट्रेन उभी होती. त्यावेळी अचानक एका डब्यातून धूर येऊ लागला. काही क्षणांतच आगीने पेट घेतला आणि संपूर्ण डबा आगीच्या ज्वालांमध्ये वेढला गेला. स्टेशनवर उपस्थित प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि लोक प्लॅटफॉर्मवरून सैरावैरा पळू लागले. घटनेची माहिती मिळताच RPF आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या स्टेशनवर पोहोचल्या. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वेळीच कारवाई केल्यामुळे आग दुसऱ्या डब्यांपर्यंत पसरली नाही. सध्या आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे, पण प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसलाही आग लागली होती. ट्रेनच्या B-1 कोचमध्ये अचानक आग भडकली होती. ही घटना सकाळी ५:१५ च्या सुमारास कोटा रेल्वे विभागातील विक्रमगड आलोट आणि लुनीरिछा स्टेशनदरम्यान घडली. त्यावेळी ट्रेनमध्ये ६८ प्रवासी होते. आगीमुळे दोन डब्यांचं नुकसान झालं, पण सुदैवाने तिथेही कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सलग दोन दिवसांत ट्रेनला आग लागण्याच्या घटनांमुळे रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सोशल मीडियावरही अनेक जण ट्रेनची सुरक्षा आणि डब्यांमधील इलेक्ट्रिकल सिस्टीमच्या तपासणीबद्दल सवाल विचारत आहेत. अनेक प्रवाशांच्या मते, उन्हाळ्याच्या दिवसांत ट्रेनच्या इलेक्ट्रिकल सिस्टीमची नियमित तपासणी होणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून अशा घटना टाळता येतील.