
मलप्पुरम: केरळच्या करिप्पूर विमानतळावर एअर इंडियाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवासी चांगलेच हैराण झाले आहेत. आज पहाटे तीन वाजता जेद्दासाठी निघणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटचे प्रवासी विमानतळावरच अडकून पडले आहेत. यामध्ये उमरा यात्रेला निघालेल्या प्रवाशांचाही समावेश आहे.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइटबद्दल एअर इंडियाकडून त्यांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेले जवळपास ३० प्रवासी सकाळपासून विमानतळावर ताटकळत बसले आहेत.
हा सगळा प्रकार एअर इंडियाच्या व्यवस्थापनातील गोंधळामुळे झाला आहे, असा थेट आरोप प्रवाशांनी केला आहे. मात्र, यावर एअर इंडियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा प्रवाशांना कोणतीही पर्यायी व्यवस्था करून देण्यात आलेली नाही.