
Marriage Pressure : आजकाल २५ व्या वर्षी अनेकजण आपलं शिक्षण पूर्ण करत असतात किंवा करिअरमध्ये काय करायचं हे ठरवत असतात. भारतात लग्नाचं कायदेशीर वय १८ असलं तरी, अनेकजण या वयात स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत असतात. पण तरीही, भारतातल्या तरुण-तरुणींना, विशेषतः मुलींना, वयाच्या पंचविशीतच घरच्यांकडून आणि नातेवाईकांकडून लग्नासाठी दबाव सहन करावा लागतो. 'आता नाही तर वय निघून जाईल' असं त्यांना सतत ऐकवलं जातं.
अशाच परिस्थितीतून जाणाऱ्या एका तरुणीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिने गुपचूपपणे तिच्या आईला आणि इतर नातेवाईकांना रेकॉर्ड केलं, जे तिला 'वय वाढत चाललंय, लवकर लग्न कर' असा आग्रह करत होते. 'नंतर प्रेग्नन्सीमध्ये अडचण येईल' आणि 'चेहऱ्यावरचा ग्लो जाईल' अशा अनेक गोष्टी नातेवाईक बोलताना ऐकू येत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आणि त्यावर लोकांच्या भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही लोकांनी तिच्या कुटुंबाला आणि भारतीय समाजातील अशा 'सामाजिक नियमांवर' टीका केली, तर काहींनी त्या तरुणीला खंबीर राहण्याचा आणि घरच्यांच्या दबावाला बळी न पडण्याचा सल्ला दिला.
व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं, “मी २५ वर्षांची आहे आणि ही माझी कहाणी आहे. प्रत्येक नातेवाईक घरी येऊन मला लग्न करण्याचा सल्ला देतो, पण आयुष्यात काहीतरी कर किंवा स्वतःच्या पायावर उभी राहा असं कुणीही सांगत नाही... त्यांना माझ्या करिअरची चिंता नाही, पण माझ्या दिसण्याची आहे. मी म्हातारी होत आहे, मला नवरा मिळणार नाही आणि मला प्रेग्नंट राहण्यात अडचणी येतील, असं त्यांचं म्हणणं आहे... हे माझे हितचिंतक आहेत.”
हा व्हिडीओ ‘cloudgirl_rashmi’ या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर झालेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
एका युझरने कमेंट केली, “भारतीय कुटुंबं लग्नासाठी किती वेडी असतात, यावर विश्वासच बसत नाही.” दुसऱ्याने लिहिलं, “अरे काका, खरा ग्लो तर पंचविशीतच येतो, काय बोलताय तुम्ही.”
आणखी एकाने लिहिलं, “२५ हे वय खूपच कमी आहे. तू जेवढी मोठी होशील, तेवढं चांगलं... समाजाचं ऐकू नकोस. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र हो आणि तुझं आयुष्य जग. गरज पडल्यास घर सोड आणि एकटी राहा.”