Rajya Sabha Seat : राज्यसभेच्या 10 जागा रिक्त, राज्यातील 2 जागांचा समावेश; कोणाला मिळणार संधी?

Rajya Sabha Seat : यावेळी अनेक राज्यसभा सदस्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले आहेत. या स्थितीत राज्यसभेच्या 10 जागा रिक्त झाल्या आहेत.

 

Rameshwar Gavhane | Published : Jun 11, 2024 4:27 PM IST / Updated: Jun 11 2024, 09:59 PM IST

Rajya Sabha Seat : देशात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. नरेंद्र मोदी यांनी देशात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. पीएम मोदींशिवाय आणखी 71 मंत्र्यांनी शपथ घेतली. मंत्रिपदेही विभागली गेली आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेच्या 10 जागा रिक्त झाल्या आहेत.

राज्यातून कोणाला संधी मिळणार?

यावेळी अनेक राज्यसभा सदस्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकून ते लोकसभेत पोहोचले आहेत. या स्थितीत राज्यसभेच्या 10 जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये राज्यातील दोन जागांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवताना उत्तर मुंबईतून विजय मिळवला. सातारमधून उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला. रिक्त झालेल्या दोन्ही जागा भाजपच्या कोट्यातील आहेत. त्यामुळे या जागांवर कोणाला संधी दिली जाणार? याची उत्सुकता आहे.

पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेला अटीतटीच्या लढतीत पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे त्यांना संधी दिली जाणार का? याचीही उत्सुकता आहे. केंद्रीय मंत्रीमंडळात कोकण आणि मराठवाडाला संधी मिळालेली नाही. त्यामुळे प्रादेशिक समतोल साधण्यासाठी या दोन विभागातून भाजपकडून कोणाला संधी दिली जाईल याची उत्सुकता असेल.

राज्यसभेच्या कोणत्या जागा रिक्त झाल्या?

कामाख्या प्रसाद तास (आसाम)

सर्बानंद सोनोवाल (आसाम)

मीसा भारती (बिहार)

विवेक ठाकूर (बिहार)

दीपेंद्रसिंग हुड्डा (हरियाणा)

ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया (मध्य प्रदेश)

छत्रपती उदयनराजे भोसले (महाराष्ट्र)

पियुष गोयल (महाराष्ट्र)

के. सी. वेणुगोपाल (राजस्थान)

बिप्लब कुमार देब (त्रिपुरा)

पीयूष गोयल यांनी उत्तर मुंबईचा गड राखला

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेल्या केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) विजयी झाले होते. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा 3 लाख 57 हजार मतांनी पराभव केला. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ (Mumbai North Lok Sabha Election) हा भाजपच्या उमेदवारासाठी सर्वात सुरक्षित लोकसभा मतदारसंघापैकी समजला जाणारा हा मतदारसंघ आहे.

सातारा लोकसभेला उदयनराजे भोसलेंचा विजय

सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना पराभूत केले होते. त्यामुळे भाजपला दुसऱ्या प्रयत्नात सातारा मतदारसंघात कमळ फुलवता आले. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच सातारा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला होता. महायुतीत मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी रस्सीखेच झाली होती.

आणखी वाचा :

'या' तीन खात्याचा कारभार पंतप्रधान मोदीकडे, वाचा संपूर्ण बातमी

 

 

Share this article