
मुंबई : दिग्दर्शिका झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा 2' बद्दल वर्षानुवर्षे सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. द हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत झोयाने या सिनेमाच्या सिक्वेलवर काम सुरू असल्याचं कन्फर्म केलं आहे.
मॉन्सून फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना झोया म्हणाली, “हो, आम्ही त्यावर काम करत आहोत.” तिच्या या एका वाक्याने चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, केवळ एक यशस्वी सिनेमा होता म्हणून त्याचा सिक्वेल बनवण्याची इच्छा नाही, असंही झोयाने स्पष्ट केलं. तिच्या मते, अर्जुन, कबीर आणि इम्रान यांच्या आयुष्याच्या सध्याच्या टप्प्याला साजेशी कथा मिळणं गरजेचं आहे.
ती पुढे म्हणाली की, आज या तिघांच्या आयुष्यात काय घडलं असेल, हे पाहणारी एक योग्य कथा मिळतेय का, यावर आमची टीम अजूनही विचार करत आहे. पण त्यांचं आयुष्य आता कुठवर पोहोचलं असेल हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग असेल, असंही तिने नमूद केलं.
या वर्षाच्या सुरुवातीला झोयाने ZNMD 2 बद्दल बोलताना सावध भूमिका घेतली होती आणि योग्य वेळी घोषणा करेन असं म्हटलं होतं.
२०२५ मध्ये हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल हे तिघे 'यास आयलंड'च्या एका जाहिरातीसाठी एकत्र आले होते, तेव्हा सिक्वेलच्या चर्चांनी जोर धरला होता.
या तिघांना एकत्र पाहिल्यावर चाहत्यांना पुन्हा एकदा अर्जुन, इम्रान आणि कबीर यांची आठवण झाली. अनेकांना तर ही जाहिरात 'जिंदगी ना मिलेगी दोबारा 2' चा टीझरच वाटली होती. झोयाने सांगितलं की, लोकांचा प्रतिसाद इतका जबरदस्त होता की अनेकांनी त्या जाहिरातीला सिनेमाचा ट्रेलरच समजलं होतं.
त्या रियुनियनमधून सिक्वेलची घोषणा झाली नाही, पण या तिघा मित्रांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा मात्र नक्कीच वाढली.
२०११ मध्ये रिलीज झालेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये अर्जुन, कबीर आणि इम्रान या तीन बालमित्रांची स्पेनमधील रोड ट्रिपची गोष्ट होती. सुट्टी म्हणून सुरू झालेला हा प्रवास त्यांच्यासाठी आयुष्य बदलवणारा ठरतो, जिथे ते त्यांच्या भीती, नाती आणि आयुष्यातील प्राधान्यक्रमांना सामोरे जातात.
या सिनेमात कतरिना कैफ, कल्की कोचलिन आणि नसीरुद्दीन शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
एक दशकानंतरही हा सिनेमा मैत्री, वर्तमानात जगणं आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचं धाडस यांसारख्या विषयांमुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
आता झोया अख्तरने सिक्वेलवर काम सुरू असल्याचं सांगितल्यामुळे, त्या अविस्मरणीय स्पेन ट्रिपच्या अनेक वर्षांनंतर अर्जुन, कबीर आणि इम्रानच्या आयुष्यात काय घडलं हे पाहण्याची संधी चाहत्यांना मिळू शकते.
मात्र, झोयाच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होतं की, जोपर्यंत या पात्रांच्या सध्याच्या आयुष्याला योग्य ठरेल अशी कथा मिळत नाही, तोपर्यंत ZNMD 2 प्रत्यक्षात येणार नाही.