
शुक्रवारी अभिनेते सनी देओल आणि प्रीती झिंटा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊमध्ये भेट घेतली. ही भेट मुख्यमंत्री योगी यांच्या शासकीय निवासस्थानी झाली.
यावेळी मुख्यमंत्री योगींनी सनी आणि प्रीती यांना देवाच्या मूर्ती भेट दिल्या. त्यानंतर त्यांनी एकत्र फोटोही काढले.
मुख्यमंत्री योगींनी या भेटीचे फोटो त्यांच्या 'X' हँडलवरही शेअर केले आहेत. "आज लखनऊ येथील शासकीय निवासस्थानी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते @iamsunnydeol जी आणि अभिनेत्री @realpreityzinta जी यांच्यासोबत सदिच्छा भेट झाली," असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.
या भेटीपूर्वी, प्रीती आणि सनीने लखनऊमध्ये त्यांच्या आगामी 'बटवारा १९४७' या सिनेमाचं प्रमोशन केलं. या कार्यक्रमात सनीचा मुलगा करण देओलही उपस्थित होता.
सिनेमाबद्दल बोलताना सनी म्हणाला, "हा सिनेमा फाळणीच्या काळात घडणारी एक प्रेमकथा आहे. हा चित्रपट प्रत्येकाने पाहायला हवा - लहान मुलं, तरुण आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी. हा एक अर्थपूर्ण सिनेमा आहे, जो आपल्याला महत्त्वाचे धडे देतो आणि इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय समजून घेण्यास मदत करतो. सिनेमा पाहिल्यानंतर 'बटवारा' हे नाव निवडण्यात आलं. आम्हाला वाटलं की कथेसाठी हेच नाव सर्वात योग्य आहे, कारण ते सिनेमात दाखवलेल्या भावना, संघर्ष आणि अनुभव यांचं खरं प्रतिनिधित्व करतं."
प्रीती म्हणाली, "प्रत्येकाने हा सिनेमा पाहायला हवा. तुमच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना हा सिनेमा पाहण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छितो, कारण हा एक अप्रतिम आणि अर्थपूर्ण चित्रपट आहे. या सिनेमात एक मोठा संदेश आहे आणि तो सर्वांनी पाहण्यासारखा आहे."
वडिलांसोबत काम करण्याच्या अनुभवावर करण म्हणाला, "माझ्या वडिलांसोबत एका सिनेमात काम करण्याचं माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न अखेर पूर्ण झालं आहे. त्यांच्यासोबत काम करणं हा एक खास आणि अविस्मरणीय अनुभव होता. वडिलांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे."
राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला 'बटवारा १९४७' हा सिनेमा भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात प्रेम, त्याग आणि संघर्षाची कहाणी दाखवण्यात आली आहे. या सिनेमात शबाना आझमी, सनी देओल, प्रीती जी झिंटा, करण देओल, अली फजल आणि अभिमन्यू सिंग अशी मोठी स्टारकास्ट आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने संतोषी आणि सनी देओल जवळपास तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत.
आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. 'बटवारा १९४७' हा सिनेमा १४ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.