
मुंबई : संजय दत्त त्याच्या खास विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. अनपेक्षित क्षणी तो असं काही बोलून जातो की समोरच्याची बोलतीच बंद होते. मुंबईतल्या एका कार्यक्रमात असंच काहीसं घडलं. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्याला मराठीत काहीतरी बोलायला सांगितलं. पण संजूबाबाने जे उत्तर दिलं, ते भलतंच होतं.
मराठी अस्खलितपणे का बोलता येत नाही, हे सांगताना त्याने थेट आपल्या येरवडा जेलमधल्या दिवसांची आठवण काढली. त्याच्या या मजेशीर उत्तराने मंत्री आणि मंचावरील इतर सगळेच जण खळखळून हसले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Sanjay Dutt has been living in Mumbai for more than 50 years, and he himself says that even after spending 6 years in Yerwada Jail, he still couldn’t learn Marathi.
And he openly admitted this in front of everyone, without any shame. So now, will MNS and Uddhav Thackeray’s party… pic.twitter.com/kLQ7AxZfBa— Amit Kumar Sindhi (@AMIT_GUJJU) September 6, 2026
या कार्यक्रमादरम्यान, प्रताप सरनाईक यांनी संजय दत्तला उपस्थितांशी मराठीत संवाद साधायला सांगितलं. "मी सगळ्यांना मराठी बोलायला शिकवतोय," असं सरनाईक यांनी गंमतीत माईककडे बोट दाखवत म्हटलं.
यानंतर संजय दत्तने माईक हातात घेतला आणि आपल्या नेहमीच्या अंदाजात उत्तर दिलं. येरवडा जेलमधल्या दिवसांची आठवण काढत तो म्हणाला, "मी तिथे जवळपास सहा वर्षे होतो, तरीही मला धड मराठी शिकता आली नाही. फक्त थोडी थोडीच भाषा मला जमली."
त्याच्या या अनपेक्षित उत्तराने कार्यक्रमातलं गंभीर वातावरण एकदम हलकंफुलकं झालं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.
संजूबाबा फक्त विनोद करून थांबला नाही. त्याने कार्यक्रमात बोलावल्याबद्दल प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आणि त्यांच्या जुन्या मैत्रीवरही भाष्य केलं.
सरनाईकांच्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला की, "आमची ओळख जवळपास २५ वर्षांपासूनची आहे."
त्याच्या या मैत्रीपूर्ण वागण्याने मंचावरील वातावरण आणखीनच खेळीमेळीचं झालं. मराठी बोलण्याच्या एका साध्या विनंतीचं रुपांतर कार्यक्रमातील एका मनोरंजक क्षणात झालं.
हा मराठी भाषेचा मुद्दा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा महाराष्ट्राचा परिवहन विभाग मुंबईतील ऑटोरिक्षा चालकांमध्ये मराठीच्या महत्त्वावर जोर देत आहे. सरनाईक यांनी भाषणात या मुद्द्याचा उल्लेख केला आणि गंमतीने म्हणाले की, "मी सध्या सगळ्यांना मराठी शिकवत आहे".
त्यानंतर त्यांनी संजय दत्तकडे वळून म्हटलं की, "संजय दत्त हिंदी बोलतो, पण इथल्या लोकांना मराठी समजते", असं म्हणत त्यांनी अभिनेत्याला मराठीत बोलण्यास प्रोत्साहन दिलं.
दरम्यान, संजय दत्त चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. २०२६ मध्ये तो सलमान खानसोबत '7 डॉग्स' या अरबी चित्रपटात विशेष भूमिकेत दिसला. याशिवाय, अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित 'आखरी सवाल' या राजकीय ड्रामामध्येही तो दिसला होता. यात नमाशी चक्रवर्ती, अमित साध, त्रिधा चौधरी आणि समीरा रेड्डी यांच्याही भूमिका आहेत.