
बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पत्नी नीतू कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर साहनी यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या आहेत. नीतू कपूर यांनी आपल्या पतीसोबतचा एक जुना फोटो शेअर करत त्यांच्या गोड आठवणींमध्ये रमून गेल्या. ऋषी आणि नीतू यांनी २२ जानेवारी १९८० रोजी लग्न केलं होतं. त्यांना रिद्धिमा कपूर साहनी आणि सुपरस्टार रणबीर कपूर ही दोन मुलं आहेत. ७० आणि ८० च्या दशकात या जोडीने 'अमर अकबर अँथनी', 'खेल खेल में', 'रफू चक्कर', 'कभी कभी', 'बेशरम' यांसारख्या अनेक हिट सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. त्यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री अनेक पिढ्यांसाठी एक उदाहरण ठरली.
दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक राज कपूर आणि कृष्णा कपूर यांचे सुपुत्र ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी झाला होता. बालकलाकार म्हणून त्यांनी वडील राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर' (१९७०) या सिनेमातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर १९७३ मध्ये डिंपल कपाडिया यांच्यासोबत 'बॉबी' या सिनेमातून त्यांनी नायक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. अनेक दशकांच्या आपल्या करिअरमध्ये ऋषी कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. 'खेल खेल में', 'रफू चक्कर', 'अमर अकबर अँथनी', 'कभी कभी', 'कर्ज', 'नसीब', 'प्रेम रोग', 'चांदनी', 'सागर', 'अग्निपथ', 'कपूर अँड सन्स' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
चित्रपटसृष्टीकडून आदरांजली
दिग्दर्शक सुभाष घई यांनीही एक भावनिक पोस्ट शेअर करत ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी १९८० सालच्या 'कर्ज' या म्युझिकल रिव्हेंज थ्रिलर सिनेमाबद्दल ऋषी कपूर यांनी केलेल्या एका मध्यरात्रीच्या फोन कॉलची आठवण सांगितली. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा एक जुना फोटो शेअर करत घई यांनी लिहिलं, "२०१० सालची गोष्ट आहे. रात्री जवळपास अडीच वाजता माझा फोन वाजला. मी आश्चर्यचकित होऊन फोन उचलला, तर पलीकडून ऋषी कपूरचा आवाज आला, ‘साल्या, काय पिक्चर बनवलायस तू!!’ मी विचारलं, ‘कोणता?’ तो म्हणाला, ‘अरे आपला... कर्ज. आत्ताच परत पाहिला. आता तू झोप.’ असं म्हणून त्याने फोन कट केला... हे फक्त ऋषी कपूरच करू शकत होता. 'कर्ज' १९८० मध्ये बनला होता. आज त्याच्या वाढदिवशी आठवतंय की, १९७२ ते १९९९ पर्यंत तो पडद्यावरचा सर्वात आकर्षक रोमँटिक स्टार होता. त्यानंतर करिअरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून त्याने प्रत्येक दिग्दर्शकाला चकित केलं," अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली. ते पुढे म्हणाले, "इंडस्ट्रीत मी पाहिलेला तो सर्वात प्रेमळ आणि स्पष्टवक्ता माणूस होता." घई यांनी नीतू कपूर यांचीही प्रशंसा केली. ते म्हणाले की, "फक्त त्याची पत्नी नीतूच त्याला सांभाळू शकत होती. तिला सलाम... मला ही जोडी खूप आवडायची... हॅपी बर्थडे चिंटू," असं म्हणत त्यांनी आपली पोस्ट संपवली. ही पोस्ट इन्स्टाग्रामवर पाहा.
अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीही ऋषी कपूर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदरांजली वाहिली. जॅकी यांनी लिहिलं, "ऋषीजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आठवणीत! तुम्ही नेहमी आमच्या हृदयात असाल." या पोस्टच्या बॅकग्राउंडला त्यांनी 'कर्ज' सिनेमातील लोकप्रिय गाणं 'दर्द-ए-दिल दर्द-ए-जिगर' वापरलं. ऋषी कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनी 'आजाद देश के गुलाम' (१९९०), 'औरंगजेब' (२०१३) आणि 'चॉक एन डस्टर' (२०१६) यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं.