
मुंबई : नितेश तिवारींच्या 'रामायण' या बिग बजेट सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आणि सोशल मीडियावर त्यावर चर्चांना उधाण आलं आहे. VFX, कास्टिंग आणि व्हिज्युअल्सचं कौतुक होत असतानाच, सिनेमातल्या कपड्यांवरून आणि दागिन्यांवरून प्रश्न विचारले जाऊ लागले. अनेकांनी कैकेयी, सीता आणि शूर्पणखा यांचा लूक गरजेपेक्षा जास्त मॉडर्न असल्याचं म्हणत, त्याची तुलना थेट रामानंद सागर यांच्या क्लासिक 'रामायण'शी केली. पण १९८७ साली आलेल्या त्या 'रामायण' मालिकेसाठी इतक्या कमी बजेटमध्ये कपडे आणि दागिने कसे तयार केले होते?
एवढ्या कमी बजेटमध्ये कशी बनली होती रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका?
रामानंद सागर यांनी खूप कमी खर्चात आणि अनेक क्रिएटिव्ह आयडिया वापरून 'रामायण' ही लोकप्रिय टीव्ही मालिका बनवली होती. रिपोर्ट्सनुसार, ७८ एपिसोडच्या या मालिकेचं एकूण बजेट जवळपास ७ ते ९ कोटी रुपये होतं. म्हणजे एका एपिसोडसाठी साधारण ९ लाख रुपये खर्च झाले. याउलट, आताच्या 'रामायण' सिनेमाचं बजेट जवळपास ४००० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय, ज्यात हाय-एंड VFX वापरण्यात आला आहे.
'रामायण'चे कपडे कोणी तयार केले होते?
रामानंद सागर यांनी स्वतः कपड्यांच्या डिझाइनवर विशेष लक्ष दिलं होतं. या मालिकेतील प्रभू राम, सीता माता, लक्ष्मण आणि इतर प्रमुख पात्रांचे कपडे 'मगनलाल ड्रेसवाला' यांनी तयार केले होते. ही भारतातील सर्वात जुन्या कॉस्च्युम सप्लायर कंपन्यांपैकी एक आहे, याला जवळपास १०० वर्षांचा वारसा आहे. या कंपनीच्या नावाची नोंद 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्येही आहे. असं म्हणतात की, भारताचा पहिला बोलपट 'आलम आरा'साठीही याच कंपनीने कपडे तयार केले होते. इतकंच नाही, तर महाभारत, मुघल-ए-आझम, रोटी कपडा और मकान, ज्वेल थीफ, चाणक्य, कोहिनूर आणि ताजमहल यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमा आणि मालिकांसाठीही त्यांनीच कपडे डिझाइन केले होते.
रामायणमधील दागिने कसे तयार झाले होते?
'रामायण' मालिकेचे सेट आणि दागिने प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर हिराभाई पटेल यांनी डिझाइन केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक पात्राचे दागिने बनवण्याआधी ते स्वतः हाताने त्याचं स्केच काढायचे आणि रामानंद सागर यांच्यासोबत त्यावर चर्चा करायचे. डिझाइन फायनल झाल्यावरच खरे दागिने बनवले जायचे. यामुळेच आजही त्या मालिकेतील प्रत्येक पात्राचा लूक केवळ भारतीय टीव्ही विश्वासाठीच नाही, तर संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीसाठी एक बेंचमार्क मानला जातो.