
Jalgaon Crime : जळगावमधील चोपडा शहरात एका 32 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर दोघे संशयित फरार आहेत. सुरुवातीला मृताची ओळख पटत नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाल्या, मात्र टॅटू आणि लग्नपत्रिकेच्या आधारे ओळख निश्चित करण्यात आली.
चोपडा शहरातील तिरंगा चौक परिसरात हतनूर पाटचारी भागात ही धक्कादायक घटना घडली. प्रदीप राजेंद्र माळी (वय 32) या तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत चेतन सुभाष कानडे याला ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, प्रदीप माळी हा विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर यांच्यासोबत दुचाकीवर जाताना दिसून आला. ही दृश्ये रात्री 9.03 वाजताची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. या फुटेजमुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 13 मार्च रोजी चेतन कानडे याने प्रदीप माळीची पानटपरी जाळली होती. या घटनेवरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याच वैमनस्यातून हा खून करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हत्या झाल्यानंतर सकाळी साडेसात वाजता मृतदेह आढळून आला. मात्र सुरुवातीला मृताची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी अंगावरील कपडे, हातावरील टॅटू आणि खिशात सापडलेल्या लग्नपत्रिकेच्या आधारे ओळख निश्चित केली. मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत चेतन कानडे याच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे.
मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केला. आरोपींना अटक होईपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.
सध्या पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे चोपडा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.