
जेवताना मोबाईल वापरू नका : मोबाइल फोन हा आता आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. संवाद साधण्याबरोबर तो बहुपयोगी ठरत आहे. पण त्याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. कारण मोबाइल फोन हे आता एक प्रकारचे व्यसन झाले आहे. त्यात माणूस एवढा गढून जातो की, आजूबाजूला काय चालले आहे, याचेही भान राहात नाही. हाती फोन असल्यावर घरातल्या व्यक्तींशी संवादच खुंटला आहे. याशिवाय, ही सवय आरोग्यावरही अनेक प्रकारे परिणाम करते.
आजकाल जेवताना मोबाइल किंवा टीव्ही पाहणे ही एक सामान्य सवय झाली आहे. लहान मुलांना जेवण भरवताना पालकही मोबाइल वापरतात. पण तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर या सवयीचा हळूहळू वाईट परिणाम होत आहे. जेवताना मोबाइल पाहिल्यामुळे होणाऱ्या संभाव्य आरोग्य समस्या आणि धोक्यांबद्दल येथे माहिती दिली आहे.
जेवणाची वेळ फक्त पोट भरण्यासाठी नसते, तर ती मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासासाठी एक महत्त्वाचा काळ असतो. यावेळी, मुले पालकांशी डोळ्यांनी संपर्क साधून बोलायला, आवाज ऐकायला आणि चेहऱ्यावरील हावभाव समजून घ्यायला शिकतात.
बोलण्यात उशीर (Speech Delay) : मूल जेवताना मोबाइलच्या स्क्रीनमध्ये व्यस्त असल्याने, ही संवादाची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. यामुळे मुलांना शब्द ऐकणे, समजून घेणे आणि पुन्हा बोलणे शक्य होत नाही. यामुळे बोलण्यास उशीर होण्याची शक्यता असते.
वर्तणुकीच्या समस्या : दीर्घकाळ असेच चालू राहिल्यास, मुले मोबाइलशिवाय जेवायला नकार देऊ शकतात किंवा चिडचिड करू शकतात. जेवणाकडे त्यांचे लक्ष लागत नाही. स्वतंत्रपणे जेवण्याची क्षमता उशिरा विकसित होते, जी एक धोकादायक बाब आहे.
मुलांप्रमाणेच प्रौढ व्यक्तींनाही जेवताना मोबाइल पाहण्याची सवय लागते. यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
जास्त कॅलरी सेवन : जेवताना मोबाइल पाहिल्याने लक्ष विचलित होते. यामुळे आपण किती अन्न खातो याकडे लक्ष न देता गरजेपेक्षा जास्त खातो. यामुळे अतिरिक्त कॅलरी सेवन होते आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो.
चयापचय समस्या : अन्नाचे प्रमाण आणि पोट भरल्याच्या संकेतांकडे दुर्लक्ष केल्याने दीर्घकाळात चयापचय (Metabolism) संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
3. इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका
जेवताना मोबाइल फोन वापरल्याने थेट इन्सुलिन रेझिस्टन्स (Insulin Resistance) होऊ शकतो, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. याचे कारण असे की, लक्ष विचलित झाल्यामुळे जास्त खाणे, प्रक्रिया केलेल्या पदार्थांची निवड करणे आणि रक्तातील साखरेची पातळी वाढणे असे प्रकार घडतात. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. म्हणून, जेवताना पूर्णपणे अन्नावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
4. स्क्रीन-फ्री जेवण का महत्त्वाचे आहे?
जेवणाच्या वेळी मोबाइल फोन, टीव्ही किंवा टॅब्लेट पूर्णपणे बंद ठेवणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मोबाइल-टीव्ही न पाहता जेवल्याने मुलांना नवीन शब्द शिकायला, अन्नपदार्थ ओळखायला आणि पालकांसोबत नातेसंबंध दृढ करायला चांगली संधी मिळते. प्रौढांसाठी, हळू जेवणे, चव आणि प्रमाणावर लक्ष केंद्रित केल्याने जास्त खाणे टाळता येते. यामुळे शरीरातील भूक आणि पोट भरल्याचे संकेत समजणे सोपे होते, ज्यामुळे रक्तातील साखर आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.