
दिल्ली : अंडर-१९ आशिया कपनंतर विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात स्फोटक शतक झळकावणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीचे काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी कौतुक केले आहे. 'याआधी वयाच्या चौदाव्या वर्षी अशी विलक्षण प्रतिभा दाखवणाऱ्या खेळाडूचे नाव सचिन तेंडुलकर होते. पुढे त्याचे काय झाले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याला भारतासाठी खेळवण्यासाठी आपण अजून कशाची वाट पाहत आहोत?' असा सवाल शशी थरूर यांनी एक्स पोस्टमध्ये विचारला.
काल विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध वैभवने ३५ चेंडूत शतक झळकावले होते. त्यानंतर ५४ चेंडूत १५० धावा पूर्ण करून लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान १५० धावांचा विश्वविक्रमही त्याने आपल्या नावावर केला. द्विशतकाच्या जवळ पोहोचलेला वैभव ८४ चेंडूत १९० धावा करून बाद झाला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विश्वविक्रमही वैभवने काल आपल्या नावावर केला. १९८६ मध्ये रेल्वेकडून खेळताना १५ वर्षे आणि २०९ दिवसांच्या वयात शतक झळकावणाऱ्या जहूर इलाहीचा विक्रम १४ वर्षे आणि २७२ दिवसांच्या वैभवने मोडला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी किमान वय १५ वर्षे असणे आवश्यक आहे, असा ICC चा नियम आहे. २०२० मध्ये ICC ने हा नियम लागू केला. २६ मार्च २०२६ रोजी वैभव १५ वर्षांचा होईल. ज्या सामन्यात वैभवने ३५ चेंडूत शतक झळकावले, त्याच सामन्यात बिहारचा कर्णधार साकिबुल गनीने ३२ चेंडूत शतक झळकावून लिस्ट ए क्रिकेटमधील भारतीय खेळाडूच्या सर्वात वेगवान शतकाचा विक्रम केला.