
मुंबई : भारतात घर खरेदी करणं पुन्हा एकदा महाग झालं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) ताज्या आकडेवारीनुसार, २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घरांच्या किमतींमध्ये १.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या या रिपोर्टनुसार, चंदीगड, लखनौ आणि तिरुअनंतपुरम या शहरांमध्ये घरांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने देशभरातील सरासरी वाढली आहे.
रिझर्व्ह बँक दर तीन महिन्यांनी हाऊस प्राईस इंडेक्स (HPI) जाहीर करते. यासाठी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये झालेल्या घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची (Transaction-Level Data) माहिती वापरली जाते. २०२२-२३ हे वर्ष आधारभूत वर्ष (Base Year) मानून हा इंडेक्स तयार केला जातो. या इंडेक्समुळे घरांच्या किमती कोणत्या शहरात किती वाढल्या किंवा कमी झाल्या, हे समजते.
ताज्या आकडेवारीनुसार, ऑल-इंडिया HPI हा २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत ११७.५ वर पोहोचला आहे. याचाच अर्थ, २०२२-२३ च्या तुलनेत घरांच्या किमती वाढल्या आहेत. ही वाढ मुख्यत्वे चंदीगड, लखनौ आणि तिरुअनंतपुरममधील दरवाढीमुळे झाली आहे.
वार्षिक आधारावर पाहिल्यास, २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत घरांच्या किमतींमध्ये ३.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतही वाढीचा दर इतकाच होता. या वार्षिक वाढीमागे चंदीगड, जयपूर, कानपूर, लखनौ आणि तिरुअनंतपुरम या शहरांचा मोठा वाटा आहे.
२०२२-२३ या आधारभूत वर्षासाठी HPI १०० होता. त्यानंतर २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत तो ११३.४, चौथ्या तिमाहीत ११६.२ आणि आता २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत ११७.५ झाला आहे. यावरून घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होते.
RBI च्या या सर्वेक्षणात मुंबई, पुणे, नागपूर आणि ठाण्यासह देशातील १८ प्रमुख शहरांचा समावेश आहे. यात दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळूरू, लखनौ, अहमदाबाद, जयपूर, कानपूर, कोची, हैदराबाद, तिरुअनंतपुरम, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर आणि चंदीगड या शहरांचाही समावेश आहे.
RBI ने स्पष्ट केलं आहे की, ही आकडेवारी सध्या तात्पुरती (Provisional) आहे. याबद्दलची सविस्तर माहिती RBI च्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील डेटाबेस या वेबसाईटवर उपलब्ध आहे.