
नवी दिल्ली : भारतात गाडी चालवणाऱ्यांसाठी आता एक नवीन नियम लागू होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल माहिती दिली आहे. यापुढे ड्रायव्हर्सना 'ग्रेडेड पॉईंट्स' दिले जातील. जे ड्रायव्हर सुरक्षितपणे आणि नियम पाळून गाडी चालवतील, त्यांना रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. पण, जे नियम मोडतील, त्यांचे पॉईंट्स कापले जातील. ही पॉईंट्सची मर्यादा ओलांडल्यास ड्रायव्हिंग लायसन्स थेट रद्द होणार आहे. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी केंद्र सरकार हे कठोर पाऊल उचलत आहे.
SIAM च्या वार्षिक परिषदेत बोलताना नितीन गडकरी यांनी या नव्या धोरणाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "रस्ते अपघातांच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. इथे सर्वाधिक अपघात होतात आणि मृत्यूचं प्रमाणही जास्त आहे. हे अपघात कमी करण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून हे नवीन धोरण आणत आहोत." सुरक्षित ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जे चांगले चालवतील त्यांना बक्षीस मिळेल, पण नियम मोडणाऱ्यांचे पॉईंट्स कापले जातील आणि लायसन्स रद्द होईल.
वाहतुकीचे नियम मोडल्यास सध्या जो दंड आणि शिक्षेचा नियम आहे, तो कायम राहील. प्रत्येक नियमभंगासाठी ठरलेला दंड भरावाच लागेल. पण त्यासोबतच आता 'डिमेरिट पॉईंट्स' म्हणजेच निगेटिव्ह पॉईंट्सही दिले जातील. हे पॉईंट्स एका ठराविक मर्यादेपर्यंत पोहोचताच लायसन्स रद्द केलं जाईल. रस्त्यावर गाडी चालवताना शिस्त पाळणं किती गरजेचं आहे, हे लोकांना समजावं आणि त्यांनी सुरक्षित ड्रायव्हिंग करावं, यासाठी हे आवश्यक असल्याचं गडकरी म्हणाले.
जे ड्रायव्हर चांगली आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करतील, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रिवॉर्ड पॉईंट्स दिले जातील. या पॉईंट्सचा फायदा त्यांना गाडीचा विमा रिन्यू करताना मिळेल. त्यांना विम्याच्या हप्त्यात सवलत मिळू शकते किंवा इतर फायदेही दिले जातील.
गडकरींनी बसच्या सुरक्षेवरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, 2024 मध्ये बस अपघातात 3,855 लोकांचा मृत्यू झाला. बसच्या सुरक्षेसाठी 'बस बॉडी कोड' सारखे अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. रस्त्यावर गाडी चालवताना स्पीड लिमिट आणि लेनची शिस्त पाळणं अत्यंत गरजेचं आहे. हे सुरक्षेचे नियम टप्प्याटप्प्याने लागू केले जातील. खरंतर, लोकांनी स्वतःहून शिस्त पाळली तर अशा नियमांची गरजच भासणार नाही. पण भारतात दरवर्षी अपघातांची आणि मृत्यूंची संख्या वाढतच चालली आहे, त्यामुळे असे कठोर निर्णय घेणं गरजेचं झालं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अवजड वाहन चालकांच्या प्रशिक्षणातही अनेक सुधारणा केल्या जाणार आहेत. त्यांना ड्रायव्हिंगसोबतच नियमांचं शिक्षण देणंही महत्त्वाचं आहे, असं गडकरी म्हणाले. त्यांनी काही आकडेवारीही दिली - दुचाकी अपघातात 81 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सीट बेल्ट न लावल्यामुळे 14 हजार लोकांनी जीव गमावला आहे. देशात 34 हजार 'हिट अँड रन'ची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. हे सर्व अपघात निष्काळजीपणामुळे घडले आहेत, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं.