
PM-SYM Yojana Update: उतारवयात नोकरीची शाश्वती नसते आणि उत्पन्नाचे साधनही उरत नाही. हीच आर्थिक भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन योजना' सुरू केली आहे. ज्याद्वारे तुम्ही वयाच्या ६० नंतर सन्मानाने जगू शकता.
देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी कामगारांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना आखण्यात आली आहे. दरमहा थोडे थोडे पैसे गुंतवून तुम्ही वार्षिक ३६,००० रुपये (दरमहा ३,००० रु.) पेन्शन निश्चित करू शकता.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही सोपे निकष लावले आहेत.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
उत्पन्न: मासिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे.
अट: संबंधित व्यक्ती EPFO, NPS किंवा ESIC यांसारख्या सरकारी पेन्शन योजनांचा लाभार्थी नसावा. तसेच तो करदाता (Income Tax Payer) नसावा.
ही योजना विशेषतः रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी आहे. यामध्ये
रिक्षाचालक, पथविक्रेते आणि घरगुती कामगार.
शेतमजूर, बांधकाम मजूर आणि मेकॅनिक.
कचरा वेचणारे, हातमाग कामगार आणि विडी कामगार.
अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
१. आधार कार्ड
२. बचत बँक खाते (Passbook)
३. मोबाईल नंबर (जो आधारशी लिंक असावा)
तुम्ही तुमच्या जवळच्या CSC (Common Service Center) म्हणजेच 'आपले सरकार सेवा केंद्रा'वर जाऊन नोंदणी करू शकता. याव्यतिरिक्त LIC, EPFO किंवा ESIC कार्यालयातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
या योजनेत तुम्ही जेवढी रक्कम दरमहा जमा करता, तेवढीच रक्कम केंद्र सरकार तुमच्या खात्यात जमा करते. तुम्ही जेवढ्या लवकर (कमी वयात) या योजनेत सहभागी व्हाल, तितका मासिक हप्ता कमी असेल. वयाची ६० वर्षे पूर्ण होताच ही पेन्शन थेट तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल.
महत्त्वाची टीप: भविष्यातील आर्थिक ओढाताण टाळण्यासाठी ही एक सुरक्षित आणि सरकारी हमी असलेली गुंतवणूक आहे.