
आजच्या काळात कार फक्त प्रवासाचं साधन नाही, तर आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. त्यामुळे, घाईगडबडीत बॅग, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, औषधं आणि इतर सामान गाडीतच विसरून जाणं खूप सामान्य आहे. पण ही सवय कधीकधी मोठ्या संकटात टाकू शकते. विशेषतः उन्हाळ्यात, उन्हात पार्क केलेल्या गाडीच्या आतलं तापमान खूप लवकर वाढतं. यामुळे काही वस्तू खराब तर होतातच, पण सुरक्षेच्या दृष्टीनेही ते धोकादायक ठरू शकतं. पावसाळ्यातही काही वस्तू जास्त वेळ गाडीत ठेवणं चांगलं नाही.
तुम्ही रोज घेत असलेली औषधं गाडीत सोडून जाण्याची चूक करू नका. उन्हात उभ्या असलेल्या गाडीच्या आतलं तापमान झपाट्याने वाढतं. या उष्णतेमुळे काही औषधांचा दर्जा आणि परिणामकारकता कमी होऊ शकते. औषधं नेहमी त्यांना सांगितलेल्या तापमानातच ठेवणं सुरक्षित असतं. त्यामुळे, गाडीतून उतरताना तुमची औषधं सोबत न्यायला विसरू नका.
मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅब्लेट, पेनड्राईव्ह यांसारखी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स गरम गाडीत जास्त वेळ ठेवू नका. जास्त उष्णतेमुळे या गॅजेट्सची बॅटरी आणि आतले भाग खराब होऊ शकतात. जास्त वेळ उन्हात ठेवल्यास गॅजेट्स पूर्णपणे बंद पडण्याचीही शक्यता असते. शिवाय, गाडीत महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू दिसल्यास चोरांचं लक्ष वेधलं जाऊ शकतं. ते गाडीची काच फोडून काही क्षणांत या वस्तू चोरू शकतात. त्यामुळे, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स गाडीत न ठेवता सोबत नेणंच सुरक्षित आहे.
गरम गाडीत सनस्क्रीन जास्त वेळ ठेवणं टाळलेलंच बरं. जास्त तापमानामुळे सनस्क्रीनमधील काही रसायनांवर परिणाम होऊन त्याची परिणामकारकता कमी होऊ शकते. उष्णतेचा परिणाम त्याच्या पॅकेजिंगवरही होऊ शकतो. ट्यूब किंवा बाटली लीक झाल्यास गाडीच्या सीट आणि इतर भागांवर डाग पडून नुकसान होऊ शकतं. म्हणून, सनस्क्रीन गाडीत ठेवण्याऐवजी तुमच्या बॅगेत ठेवणं चांगलं.
गाडीत पाण्याची बाटली ठेवणं सामान्य आहे. पण तासन्तास उन्हात उभ्या असलेल्या गाडीतील प्लास्टिक बाटलीतलं पाणी पिणं टाळा. उष्णतेमुळे प्लास्टिकमधील काही घातक रसायनं पाण्यात मिसळण्याची शक्यता असते, असा इशारा तज्ज्ञ देतात. गाडीत पाणी ठेवायचंच असेल, तर स्टीलच्या बाटलीसारखे सुरक्षित पर्याय वापरा. जास्त वेळ उन्हात असलेल्या प्लास्टिक बाटलीतलं पाणी न पिणंच शहाणपणाचं आहे.
गाडी पार्क केल्यावर पर्स, हँडबॅग, मोबाईल फोन सीटवर सगळ्यांना दिसेल अशाप्रकारे ठेवणं धोकादायक आहे. छोटीशी बॅग जरी बाहेरून दिसत असली तरी चोरांचं लक्ष वेधून घेऊ शकते. ते खिडकीची काच फोडून पैसे, महत्त्वाची कागदपत्रं, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू चोरण्याची शक्यता असते. वस्तू गाडीत ठेवणं गरजेचं असेलच, तर त्या सीटवर न ठेवता डिक्कीत ठेवणं तुलनेने सुरक्षित आहे. पण, मौल्यवान वस्तू गाडीत न ठेवणंच उत्तम.
गाडीत चुकीच्या वस्तू ठेवल्याने फक्त वस्तूंचंच नुकसान होत नाही, तर तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. उष्णतेमुळे औषधांचा दर्जा खराब होऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स खराब झाल्यास त्यांच्या दुरुस्तीसाठी किंवा नवीन खरेदीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागते. आणि चोरी झाल्यास होणारं नुकसान तर त्याहूनही मोठं असतं.
गाडी लॉक करण्यापूर्वी काही सेकंद थांबून तपासणी करण्याची सवय लावा. पुढच्या सीट्स, मागची सीट, डॅशबोर्ड आणि डिक्की एकदा तपासा. मोबाईल फोन, लॅपटॉप, औषधं, पाण्याची बाटली, सनस्क्रीन, पर्स यांसारख्या वस्तू गाडीत राहिल्या नाहीत ना, याची खात्री करा. ही छोटीशी खबरदारी तुमचं मोठं नुकसान टाळायला मदत करेल. त्यामुळे, गाडी पार्क करून लॉक करण्यापूर्वी ही सोपी तपासणी करण्याची सवय लावून घेणं तुमच्या आणि तुमच्या गाडीच्या सुरक्षेसाठी चांगलं आहे.