
Vaibhav Suryavanshi Takes Stunning Catch : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारताने डकवर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा १८ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. या विजयात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ७२ धावांची खेळी करत भारतीय फलंदाजीचे नेतृत्व केले. कर्णधार आयुष म्हात्रे, वेदांत त्रिवेदी आणि विहान मल्होत्रा यांच्या विकेट्स गमावल्यानंतर ५३-३ अशा अडचणीत सापडलेल्या भारताला वैभवने अभिग्यान कुंडूसोबत भागीदारी करून १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.
आक्रमक फलंदाजीच नाही, तर परिस्थितीनुसार संयमाने खेळण्याची क्षमताही आपल्यात असल्याचे वैभवने दाखवून दिले. त्याने ६७ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ७२ धावा केल्या. त्यानंतर अभिग्यान कुंडूने ११२ चेंडूंत ८० धावा आणि कनिष्क चौहानने २८ धावा करून भारताला २३८ धावांपर्यंत पोहोचवले. प्रत्युत्तरात पावसामुळे बांगलादेशसमोर २९ षटकांत १६५ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. २२व्या षटकात १०६-२ अशा चांगल्या स्थितीत असलेला बांगलादेशचा संघ नंतर कोसळला.
बांगलादेशकडून कर्णधार अझीझुल हकीमने ५१ आणि रिफात बेगने ३७ धावा करत झुंज दिली. फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर वैभवने क्षेत्ररक्षणातही आपले कौशल्य दाखवले. विहान मल्होत्राच्या गोलंदाजीवर त्याने लॉन्ग ऑनवर धावत जाऊन समीउन बसीर रातुलचा अप्रतिम झेल घेतला. झेल घेतल्यानंतर तोल जाऊन तो सीमारेषेबाहेर गेला, पण त्याआधी त्याने चेंडू हवेत फेकून पुन्हा आत येत झेल पूर्ण केला. सामन्यात चार बळी घेणाऱ्या विहान मल्होत्राच्या शानदार कामगिरीमुळे भारताने १८ धावांनी विजय मिळवला.