
अहमदाबाद : टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने नीदरलँड्सचा १७ धावांनी पराभव करत स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला. शिवम दुबेची वादळी फलंदाजी आणि वरुण चक्रवर्तीची फिरकी यांच्या जोरावर भारताने नीदरलँड्सला चारों खाने चित केले.
कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात खराब झाली. 'डक'ची हॅट्ट्रिक करत अभिषेक शर्मा (०) पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. पाठोपाठ ईशान किशन (१८) देखील स्वस्त्यात माघारी परतला. तिलक वर्मा (३१) आणि सूर्या (३४) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत.
मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या शिवम दुबेने सामन्याचे चित्र पालटले. दुबेने अवघ्या ३१ चेंडूत ६६ धावांची (४ चौकार, ६ षटकार) आक्रमक खेळी केली. त्याला हार्दिक पंड्या (३०) याने चांगली साथ दिली. या जोडीच्या जोरावर भारताने २० षटकांत ५ बाद १९३ धावांचा डोंगर उभा केला. नीदरलँड्सकडून लोगन वैन बीकने ३ बळी टिपले.
१९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नीदरलँड्सची सुरुवात आश्वासक झाली होती. मॅक्स ओ'डॉड (३५) आणि लेविट यांनी लढा देण्याचा प्रयत्न केला. पण, भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत नीदरलँड्सच्या डावाला खिंडार पाडले.
वरुण चक्रवर्ती: चक्रवर्तीने ३ ओव्हरमध्ये अवघ्या १४ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी घेतले आणि नीदरलँड्सचे कंबरडे मोडले.
इतर गोलंदाज: शिवम दुबेने फलंदाजीनंतर गोलंदाजीमध्येही चमक दाखवत २ बळी घेतले, तर जसप्रीत बुमराहने १ गडी बाद केला. नीदरलँड्सचा डाव १७६ धावांवर मर्यादित राहिला.
या पराभवासोबतच नीदरलँड्सचे या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यांना या स्पर्धेत केवळ नामिबियाविरुद्ध विजय मिळवता आला. दुसरीकडे, भारताने चारपैकी चार सामने जिंकून आपली दावेदारी मजबूत केली आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघाने दोन बदल केले होते. कुलदीप यादवच्या जागी अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली, तर अक्षर पटेलला विश्रांती देऊन वॉशिंग्टन सुंदरला पदार्पणाची (World Cup Debut) संधी मिळाली.