
मुंबई: स्वप्नांची नगरी, जेथील प्रत्येक कोपऱ्यावर एखादं वेगळं स्वप्न उभं राहतं आणि प्रत्येक चेहऱ्यामागे दडलेली असते एक अनोखी कहाणी. याच शहरात, गर्दीच्या रस्त्यांवर, झगमगत्या टॉवरांच्या सावलीत, एक अशी कहाणी उभी राहिली आहे. भरत जैन यांची. एक अशी व्यक्ती जी भिक मागूनही करोडपती झाली आणि आज 'जगातील सर्वात श्रीमंत भिकारी' म्हणून ओळखली जाते.
भरत जैन यांनी आयुष्याची सुरुवात अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत केली. दररोज मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर, आजाद मैदानात आणि गर्दीच्या चौकांत ते १० ते १२ तास रस्त्यांवर भीक मागत असत. पण ही भीक त्यांच्यासाठी केवळ पोट भरण्याचं साधन नव्हतं. ती त्यांच्या स्वप्नांची पहिली पायरी होती. त्यांचं रोजचं उत्पन्न साधारण २,००० ते २,५०० रुपयांपर्यंत पोहोचायचं, आणि महिन्याच्या शेवटी ते ७५,००० रुपये सहज मिळवायचे. हे आकडे ऐकून कोणीही थक्क होईल.
पैसा मिळवणं एक गोष्ट आहे, पण त्या पैशाचं योग्य नियोजन करणं ही खरी कला आहे. आणि भरत जैन यांनी ती कमालीच्या कौशल्याने साध्य केली. त्यांनी मुंबईमध्ये दोन फ्लॅट्स खरेदी केले, ज्यांची एकत्र किंमत सुमारे १.४ कोटी रुपये आहे. याशिवाय, ठाण्यात घेतलेल्या दोन दुकानांमधून त्यांना दरमहा ३०,००० रुपयांचं भाडं मिळतं. आज त्यांची एकूण संपत्ती ७.५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
त्यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र राहतं. पत्नी, दोन मुलं, वडील आणि भाऊ हे सर्वजण त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार आहेत. भरत यांनी आपल्या मुलांना नामांकित कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण दिलं. आज त्यांची मुलं स्टेशनरीच्या व्यवसायात उतरली आहेत आणि कुटुंबाचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी मेहनत घेत आहेत. भरत यांचा प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि दूरदृष्टी यांचं जिवंत उदाहरण आहे.
इतक्या संपत्तीची आणि स्थैर्याची प्राप्ती झाल्यानंतरही भरत जैन अधूनमधून मुंबईच्या रस्त्यांवर भिक मागताना दिसतात. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना हे काम सोडण्याचा सल्ला दिला, परंतु त्यांचं म्हणणं असं की, "हीच माझी ओळख आहे, हेच माझं जगणं आहे." त्यांच्यासाठी भिक मागणं हे गरज नसून, एक मनःशांती देणारं काम झालं आहे. जी एक विचित्र पण अंतर्मुख करणारी भावना आहे.
भरत जैन केवळ श्रीमंत नाहीत, ते मनानेही खूप मोठे आहेत. ते नियमितपणे मंदिरांना देणग्या देतात आणि गरजू लोकांना मदत करतात. त्यांच्यातील नम्रता आणि साधेपणा आजही कायम आहे. श्रीमंती आल्याने अहंकाराने भरून जाणं सहज शक्य असतं, पण भरत जैन यांनी नम्रतेची वाट न सोडता, आपली मूळ ओळख जपली आहे.
भरत जैन यांची कहाणी हे दाखवते की आयुष्यात कोणताही मार्ग छोटा नसतो. गरिबी ही अडथळा असू शकते, पण ती यशाच्या वाटेला रोखू शकत नाही. जर दृढ निश्चय, कष्ट आणि शहाणपण असेल, तर कोणताही सामान्य माणूस असामान्य होऊ शकतो. भरत जैन नाव एक, पण त्यामागे असलेली कहाणी लाखोंना जगण्याची नवी दिशा दाखवणारी.