
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध काळचौकी महागणपती मंडपाजवळ रविवारी पहाटे एका आठ वर्षांच्या चिमुकलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मृत मुलीच्या नातेवाईक किस्मत यादव यांनी सांगितलं की, हा अपघात पहाटे २ वाजून ४० मिनिटांनी झाला. ही लहानगी आपल्या कुटुंबासोबत काळचौकी महागणपतीच्या दर्शनासाठी आली होती. पण तिथे खूप गर्दी असल्यामुळे, गर्दी थोडी कमी होईपर्यंत ते बाहेरच काही दुकानांजवळ थांबले होते.
"आम्ही रात्री २ च्या सुमारास तिथे पोहोचलो आणि रांगेत उभे राहिलो. त्यानंतर २:४० ला हा अपघात झाला. प्रचंड गर्दी पाहून आम्ही घरी परत जाण्याचा विचार करत होतो. आम्ही बाजूने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना आम्हाला मंडपाजवळ काही दुकाने दिसली. दर्शन न घेता गर्दी कमी होईपर्यंत तिथेच थांबावं असा विचार आम्ही केला. पण रांगेजवळच एक लाईट लावली होती. ती लाईट अचानक लोकांच्या अंगावर पडली," असं किस्मत यादव यांनी सांगितलं.
या घटनेनंतर त्यांनी आयोजकांवर तीव्र संताप व्यक्त केला. मंडप आयोजक भरपूर पैसे कमवतात, पण त्यांनी सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला. आता काहीही मागणी केली तरी गेलेली मुलगी परत येणार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. "ही पूर्णपणे मंडप आयोजकांची चूक आहे. तुम्ही बाप्पाची मूर्ती बसवता, लोकांना गोळा करता आणि त्यातून पैसे कमवता, पण लोकांसाठी काही सुरक्षा व्यवस्था आहे का? त्यांनी सुरक्षेची काळजी घ्यायला हवी होती. माझ्या स्वतःच्या दोन मुलांनाही विजेचा धक्का बसला. यात पूर्णपणे आयोजकांचाच दोष आहे. आता काहीही मागणी करून काय उपयोग?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.