
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री मदन बाफना यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. जवळपास सहा दशकांच्या जवळच्या राजकीय संबंधांची आठवण त्यांनी सांगितली. 'मदनशेठ आज आपल्यात नसले तरी, त्यांचे विचार आणि समाजाप्रती असलेली त्यांची निष्ठा कायम आठवणीत राहील,' असं पवार म्हणाले.
या जुन्या नात्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, 'जवळपास ६० वर्षे माझ्यासोबत उभा राहिलेला एक सहकारी, मदनशेठ, आज आपल्यात नाही. मी पुण्यात कॉलेज शिक्षणासाठी आलो होतो, तेव्हा माझी त्यांच्याशी पहिली भेट झाली. हे नातं त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत टिकलं,' असं पवारांनी एएनआयला सांगितलं.
बाफना यांच्या सार्वजनिक कार्याबद्दल बोलताना पवारांनी मावळ भागातील वंचित समाजासाठी केलेल्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी सरपंच, पंचायत समितीचे सभापती आणि राज्यमंत्री म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. अनेक सरकारी खात्यांचा कारभारही त्यांनी पाहिला. एक कार्यक्षम आणि यशस्वी नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
शरद पवार पुढे म्हणाले, 'जुना मुंबई-पुणे रस्त्याने प्रवास करताना वडगावला थांबून मदनशेठ यांच्या घरी भेट देण्याची माझी जुनी सवय होती. त्यांचं जाणं हे आमच्यासाठी खूप मोठं नुकसान आहे.'
मदन बाफना यांचे पुत्र आणि कुटुंबीय त्यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे चालवतील, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला. 'मदनशेठ आज आपल्यात नसले तरी, आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,' असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर या ज्येष्ठ नेत्याच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. त्यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत म्हटलं, 'ज्येष्ठ नेते, मावळचे आमदार आणि माजी राज्यमंत्री मदनलाल बाफना यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या राजकीय-सामाजिक क्षेत्रातील सर्वसामान्यांशी घट्ट नाळ असलेला एक अनुभवी नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. या कठीण काळात, माझे कुटुंबीय त्यांच्यासोबत आहेत. मदन बाफना साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली!'
ज्येष्ठ नेते मदन बाफना यांनी १९६७ मध्ये एलएलबी पूर्ण केलं होतं. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे पुणे न्यायालयात वकिली केली होती. त्यानंतर अनेक दशकं ते मावळच्या राजकारणात सक्रिय होते.