राष्ट्रवादीची ‘मंडल यात्रा’ शरद पवारांच्या हस्ते रवाना, ५२ दिवसांचा महासंपर्क मोहीम सुरू

Published : Aug 09, 2025, 09:00 PM IST
ncp sharad pawar mandal yatra

सार

राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी समाजात जनजागृतीसाठी 'मंडल यात्रा' सुरू केली आहे. ही यात्रा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून प्रवास करेल आणि ओबीसींच्या प्रश्नांवर प्रकाश टाकेल. 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ने ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. ‘मंडल यात्रा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभियानाला आजपासून अधिकृत सुरुवात झाली असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवत यात्रेचा शुभारंभ केला.

काय आहे मंडल यात्रा?

ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांच्या नेतृत्वात ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर ३६ जिल्ह्यांतून ३५८ तालुक्यांमध्ये फिरणार आहे. एकूण १४,७७३ किलोमीटरचा प्रवास ही यात्रा करणार असून, ५२ दिवस चालणाऱ्या या मोहिमेचा पहिला टप्पा विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये पार पडणार आहे.

क्रांती दिनी सुरू झालेली 'मंडल यात्रा'

९ ऑगस्ट क्रांती दिन, हा दिवस देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक निर्णायक टप्पा होता. याच दिवशी ‘माझी लाडकी बहीण’सारख्या सामाजिक योजनांपासून वेगळी, पण जनतेशी थेट संवाद साधणारी ‘मंडल यात्रा’ सुरू झाली, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे.

शरद पवार म्हणाले, मंडल आयोगाची सुरुवात महाराष्ट्राने केली

शरद पवार म्हणाले, "मंडल आयोग देशात लागू होण्याआधी, मुख्यमंत्री असताना आम्हीच महाराष्ट्रात याची अंमलबजावणी केली होती. पण आज भाजप ओबीसी समाजाला घाबरवण्याचं काम करत आहे. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी ही यात्रा काढली जात आहे."

पक्षासाठी नवा जोम, कार्यकर्त्यांसाठी नवी जबाबदारी

प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं, “ही यात्रा महाराष्ट्रात पुन्हा एकदा पुरोगामी विचारांची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न आहे. विदर्भ हे राष्ट्रवादी विचारांचं गड मानलं जातं आणि लोकसभेत हे पुन्हा सिद्ध झालं आहे.”

आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले, "प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्यात मंडल यात्रेचं स्वागत केलं जाईल. भाजपचं ओबीसींप्रती असलेलं प्रेम केवळ राजकीय स्वार्थासाठी आहे, हे जनता जाणून घेईल. ही जबाबदारी प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्याची आहे."

भाजपवर थेट आरोप

रोहित पवार म्हणतात, "कधी कमंडल यात्रा तर कधी नवा जातीयवाद भाजपने समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मंडल आयोगाविरोधातील भाजपचा इतिहास ओळखून आम्ही ही मंडल यात्रा उभारली आहे."

मंडल यात्रेमागील प्रमुख उद्दिष्टे

ओबीसी समाजात जनजागृती व संवाद

राजकीय स्वार्थासाठी जातीयतेचं राजकारण करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर

पक्षाच्या विचारांना पुन्हा बळ देणं व कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण करणं

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी कार्यसंघ मजबूत करणं

"पुरोगामी महाराष्ट्राची पुन्हा उभारणी हेच आमचं ध्येय"

ही यात्रा राजकीय संदेश देतानाच सामाजिक समरसतेचा पुरस्कार करते. सध्याच्या परिस्थितीत, जातीय आणि भाषावादी तेढ निर्माण केली जात असल्याचं पक्षाचं म्हणणं असून, मंडल यात्रा त्याविरोधात एक सकारात्मक चळवळ म्हणून पुढे येत आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

अपघाताची बातमी वाचून डोळ्यापुढं येतील अंधाऱ्या, गोंदियातील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; ४० पेक्षा जास्त प्रवासी जखमी
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ