
Gardening Tips: उन्हाळा सुरू झाला की घरातल्या झाडांवर त्याचा लगेच परिणाम दिसतो. माती लवकर सुकते, पानं करपतात, किडे वाढतात आणि मुळं कमजोर होतात. अशावेळी फक्त साधं पाणी घालणं झाडांसाठी पुरेसं नसतं. उन्हाळ्यात सर्वात प्रभावी घरगुती उपाय म्हणजे तुरटीचं पाणी (Alum Water). यामुळे मातीला थंडावा मिळतो, बॅक्टेरियाची वाढ थांबते आणि झाडांची मुळं पुन्हा सक्रिय होतात. हा सोपा उपाय तुमची बाग उन्हाळ्यातही ताजी आणि हिरवीगार ठेवेल.
उन्हाळ्यात कुंड्यांमधील माती इतकी गरम होते की झाडांची मुळं अक्षरशः जळू लागतात. तुरटीचं पाणी मातीचं तापमान झपाट्याने कमी करतं. हे मातीत थंडावा आणि ओलावा दोन्ही टिकवून ठेवतं, ज्यामुळे झाडं दिवसा कडक ऊन सहन करू शकतात. झाडांना पाणी देण्यासाठी सकाळची ७ ते ९ किंवा संध्याकाळची ६ ते ७ ही वेळ उत्तम आहे, कारण तेव्हा तापमान थोडं कमी असतं.
गरम हवामानात कीड आणि बुरशी दोन्ही वेगाने वाढतात, विशेषतः पांढरी बुरशी, लहान माश्या आणि मातीतले सूक्ष्म कीटक. तुरटीचं पाणी मातीचा पृष्ठभाग स्वच्छ करतं आणि कोणत्याही रासायनिक फवारणीशिवाय कीटकांना वाढण्यापासून रोखतं. तुळस, मनी प्लांट, कोरफड, ओवा, गुलाब आणि इतर हर्ब्ससारख्या झाडांवर याचा सर्वात जास्त चांगला परिणाम दिसतो.
उन्हाळ्यात नळाचं पाणी अधिक जड (Hard) होतं, ज्यामुळे माती अल्कधर्मी (alkaline) होते आणि झाडांना जमिनीतून पोषक तत्वं शोषून घेता येत नाहीत. तुरटीचं पाणी या जडपणाला कमी करतं आणि मातीचा समतोल राखतं. यामुळे झाडांची पानं पिवळी पडत नाहीत आणि नवीन पालवी लवकर फुटते.
उन्हाळ्यात लोक अनेकदा झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी देतात, ज्यामुळे मुळं सडण्याची समस्या निर्माण होते. तुरटीचं पाणी मातीला सच्छिद्र बनवतं, ज्यामुळे अतिरिक्त पाणी सहजपणे वाहून जातं आणि मुळं सुरक्षित राहतात. जे लोक रोज झाडांना पाणी घालतात, त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे.
उन्हामुळे झाडांची पानं करपणे ही एक मोठी समस्या आहे. तुरटीच्या पाण्याची पानांवर हलकी फवारणी केल्यास धुळीचे कण निघून जातात, चिकटपणा कमी होतो आणि पानं उन्हाचा तडाखा सहज सहन करू शकतात. हा उपाय मनी प्लांट, स्नेक प्लांट, स्पायडर प्लांट आणि पीस लिली यांसारख्या झाडांवर खूप चांगला परिणाम करतो.