
नवरा-बायकोचं नातं हे फक्त प्रेमाचं नाही, तर एकमेकांना आदर देण्याचंही असतं. त्यांच्यात कधी मतभेद किंवा भांडण झालंच, तर ते आपापसात मिटवणं महत्त्वाचं आहे. कारण घरातली गोष्ट बाहेर गेली की नात्यात कटुता येते. अध्यात्मिक गुरू जया किशोरी यांनी नवरा-बायकोचं नातं कसं मजबूत करायचं, यासाठी एक खास मंत्र दिला आहे. प्रत्येक विवाहित जोडप्याला ही गोष्ट माहित असणं खूप गरजेचं आहे.
जया किशोरी सांगतात की, नवरा-बायकोचं नातं हे फक्त दोघांचं असतं आणि ते तसंच राहिलं पाहिजे. जर काही वाद झाला, तर लोकांसमोर भांडू नका. त्यापेक्षा एका खोलीत जा आणि पार्टनरला सांगा की मला तुझं हे वागणं आवडलं नाही किंवा यामुळे मला त्रास झाला. जर तुम्ही बाहेरच्या लोकांसमोर भांडायला लागलात, तर तुमचं नातं बिघडू शकतं. कोणतीही तिसरी व्यक्ती तुमच्या नात्यात आली, तर ती नातं खराबच करेल. त्यामुळे एकमेकांच्या चुका लोकांसमोर काढणं टाळलं पाहिजे.
जया किशोरी यांच्या मते, नातं मजबूत ठेवण्यासाठी एकमेकांशी बोलणं (कम्युनिकेशन) खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पार्टनरशी मोकळेपणाने बोलला नाहीत, तर ते नातं जास्त काळ टिकणार नाही. शांत बसणं हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. जर कोणता विषय असेल, तर त्यावर शांतपणे बोला. यामुळे नात्यात दुरावा येत नाही.
एकमेकांचा आदर करणं आणि एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही सतत भांडत असाल किंवा प्रेमाने बोलत नसाल, तर असं नातं टिकवणं खूप अवघड होऊन बसतं. नवरा-बायकोमध्ये कितीही मोठं भांडण झालं तरी एकमेकांच्या आदराला धक्का लागता कामा नये.