Operation Sindoor हवाई हल्ल्यासाठी “ऑपरेशन सिंदूर” हेच नाव का निवडले, जाणून घ्या या मागचे कारण

Published : May 07, 2025, 06:07 AM ISTUpdated : May 07, 2025, 06:13 AM IST
operation sindoor

सार

विशेषतः विवाहित महिलांचे पती या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले, ज्यामधून केवळ जीव घेण्याचा नव्हे, तर भारतीय संस्कृतीवर आणि कुटुंबव्यवस्थेवर घाव घालण्याचा उद्देश स्पष्ट दिसून आला.

नवी दिल्ली- २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकप्रिय ठिकाण असलेल्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारताला हादरवून सोडलं. या क्रूर हल्ल्यात २५ भारतीय नागरिकांसह एका नेपाळी नागरिकाचा बळी गेला. विशेषतः विवाहित महिलांचे पती या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले, ज्यामधून केवळ जीव घेण्याचा नव्हे, तर भारतीय संस्कृतीवर आणि कुटुंबव्यवस्थेवर घाव घालण्याचा उद्देश स्पष्ट दिसून आला. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून ऑपरेशन सिंदूर सुरु करण्यात आले. त्यात पाकिस्तानमधील लष्करी छावण्यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

हल्लेखोरांनी बैसरन भागातील पर्यटकांवर निशाणा साधला, मात्र कोणत्याही महिलेला लक्ष्य करण्यात आलं नाही. त्याऐवजी सिंदूर लावलेल्या विवाहित महिलांच्या पतींची निवड केली गेली, असं सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. ही एक प्रकारची भावनिक आणि सांस्कृतिक हिंसा होती, जी केवळ गोळ्यांनी नव्हे तर मूल्यांवर घालण्यात आलेल्या वारांद्वारे होती.

‘ऑपरेशन सिंदूर’

एक प्रतीकात्मक आणि निर्णायक कारवाई भारतीय सशस्त्र दलांनी हाती घेतली आणि त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं. हे केवळ एक लष्करी कोड नव्हतं, तर भारताच्या सांस्कृतिक आत्म्याचे रक्षण करण्याचं प्रतीक होतं. ज्या सिंदूराला मिटवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला, त्या सिंदूरचं नाव घेऊन भारताने त्यांच्या अड्ड्यांवर निर्णायक हल्ला चढवला.

या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या एकूण नऊ दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यात आला. हे सर्व लक्ष्य विशिष्टपणे दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केंद्रित होते. कोणत्याही नागरी किंवा पाकिस्तानी सैन्याच्या संरचनांना स्पर्श न करता अत्यंत अचूकतेने ही कारवाई पार पाडण्यात आली.

न्यायाचा मार्ग, सूडाचं उत्तर ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पुन्हा एकदा हे दाखवून दिलं की तो युद्धप्रेमी देश नाही, पण आपल्या नागरिकांवर, संस्कृतीवर झालेल्या हल्ल्याला मूकपणे सहन करणारा देशही नाही. भारताची ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत असून, दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या शक्तींना आता परिणामांचा सामना करावा लागेल, असा स्पष्ट संदेश देणारी आहे.

सिंदूर वाचवण्यासाठीची लढाई ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक लष्करी मोहीम नव्हती. ती भारतीय संस्कृती, मातृत्व, आणि कुटुंबव्यवस्थेच्या रक्षणाची शपथ होती. सिंदूर म्हणजे एक स्त्रीच्या आयुष्याचा सन्मान, तिच्या पतीचं अस्तित्व, तिच्या ओळखीचा भाग. दहशतवाद्यांनी तोच सिंदूर पुसण्याचा प्रयत्न केला आणि त्याच सिंदूरच्या नावावरून भारताने न्यायाची लढाई लढली.

ही लढाई केवळ सीमेवर लढली गेली नाही, तर ती प्रत्येक भारतीयाच्या मनात पेटलेल्या अग्नितुल्य होती. आणि त्यात भारत विजयी ठरला.

PREV

Recommended Stories

iPhone 18 Pro Max: बायकोला सरप्राईज देण्यासाठी दिल्लीच्या पठ्ठ्याने विकलं खानदानी सोनं!
20th Asian Games: जपानमध्ये २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात; मनू भाकर, पवन सेहरावतने फडकवला तिरंगा