
Bilaspur Train Accident: छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी जयरामनगर स्टेशनजवळ मोठा रेल्वे अपघात झाला. येथे एक पॅसेंजर ट्रेन समोर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की पॅसेंजर ट्रेनचा एक डबा मालगाडीवर चढला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बचाव पथकाने ४ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर दोन डझनहून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कसा आणि कोणाच्या चुकीमुळे झाला, हे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पॅसेंजर ट्रेनने सिग्नल ओलांडल्याने (ओव्हरशूट) हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, लोकल ट्रेनने सिग्नल ओव्हरशूट केला आणि त्यामुळे ती समोर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. रेल्वेने म्हटले आहे की, घटनेच्या कारणांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे, जेणेकरून अचूक माहिती मिळू शकेल.
घटनास्थळी बिलासपूर जिल्ह्याचे एसपी आणि जिल्हाधिकारी उपस्थित आहेत. रेल्वे पथक आणि स्थानिक पोलीस सध्या बचावकार्यात गुंतले आहेत. ट्रेनमध्ये अडकलेल्या लोकांना गॅस कटरच्या मदतीने बाहेर काढले जात आहे. छत्तीसगडचे आरोग्य मंत्री श्याम बिहारी जयस्वाल यांनी सांगितले की, अजूनही अनेक प्रवासी ट्रेनमध्ये अडकले आहेत, ज्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. एवढेच नाही, तर अपघाताची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश घटनास्थळी पोहोचले आहेत.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सोयीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकांवर प्रवासी आणि त्यांचे कुटुंबीय कॉल करून मदत मागू शकतात. तसेच, परिस्थितीची सत्यता जाणून घेऊ शकतात. याशिवाय, रेल्वेने दोन आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत, ज्यांवर तातडीने मदत मिळेल.
आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक