
बॉलिवूडची 'मिसेस फनीबोन्स' म्हणून प्रसिद्ध असलेली, स्टार अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी, ती तिच्या लेख आणि पुस्तकांमधून नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने तिच्या पालकत्वाच्या (Parenting) पद्धतीबद्दल आणि मुले आरव व नितारा यांना देत असलेल्या डेटिंगच्या सल्ल्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले.
सहसा पालक मुलांसमोर असे वागतात की जणू त्यांना सर्व काही माहित आहे. पण ट्विंकल याच्या अगदी विरुद्ध आहे. 'द प्रिंट'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "माझ्याकडूनही चुका होतात हे मी मान्य करते. नुकतेच प्रवासात असताना माझी मुलगी नितारासोबत एका विषयावरून वाद झाला. तिथे तिचे म्हणणे बरोबर होते आणि मी चुकीची होते. तेव्हा मी तिला थेट सांगितले - 'मी एक परिपूर्ण आई आहे अशी अपेक्षा करू नकोस. तुझ्याप्रमाणेच मी सुद्धा चुका करते. फक्त तुझ्यापेक्षा थोडा जास्त अनुभव असेल. मी जशी आहे तसाच माझा स्वीकार कर.' अशाप्रकारे चुका मान्य केल्याने मुलांसोबत चांगले नाते निर्माण होते," असे मत तिने व्यक्त केले.
आजच्या काळात सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबद्दल बरीच चर्चा होते. याबद्दल चिंता व्यक्त करत ट्विंकल म्हणाली, "इन्स्टाग्रामवर अर्धवट सायकॉलॉजीच्या गोष्टी ऐकून त्या आयुष्यात अवलंबणे धोकादायक आहे. खरी थेरपी (Therapy) घेणे चांगले आहे, ती आपले मन समजून घेण्यास मदत करते. पण सोशल मीडियाच्या 'फिल्टर्ड' ज्ञानापासून दूर राहा," असा सल्ला तिने दिला आहे.
ट्विंकलला २४ वर्षांचा मुलगा आरव आणि १३ वर्षांची मुलगी नितारा आहे. दोघांचे व्यक्तिमत्त्व वेगळे असल्यामुळे, त्यांना दिलेला डेटिंग आणि नात्यांचा सल्लाही वेगवेगळा असतो, असे तिने सांगितले.
मुलगा आरवला सल्ला: "माझा मुलगा खूप मृदू स्वभावाचा आणि दयाळू आहे. लहानपणापासूनच तो सर्वांवर विश्वास ठेवतो. त्यामुळे मी त्याला नेहमी सांगते की - 'स्वतःच्या काही सीमा (Boundaries) आखून घे. तू जास्त दयाळूपणा दाखवलास तर लोक तुझा गैरफायदा घेऊ शकतात.' नात्यांमध्ये थोडे कणखर राहायला त्याने शिकले पाहिजे," असे ट्विंकल म्हणते.
मुलगी निताराला सल्ला: मुलीच्या बाबतीत ट्विंकलचा सल्ला पूर्णपणे उलट आहे! "नितारा नुकतीच १३ वर्षांची झाली आहे. ती खूप आक्रमक (Aggressive) आहे. त्यामुळे तिने आपला आक्रमक स्वभाव थोडा कमी करावा आणि इतरांशी वागताना आपल्या सीमा थोड्या शिथिल कराव्यात, असे मी तिला सांगते," असे तिने म्हटले आहे.
एकंदरीत, पती अक्षय कुमारप्रमाणेच ट्विंकल सुद्धा मुलांना शिस्तीने वाढवत असली तरी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार स्वातंत्र्य आणि मार्गदर्शन देत आहे, हे कौतुकास्पद आहे. २००१ मध्ये लग्न केलेले हे जोडपे बॉलिवूडमधील यशस्वी जोडप्यांपैकी एक असून, ते आपल्या मुलांना नेहमी लाइमलाइटपासून दूर ठेवून संस्कारक्षम पद्धतीने वाढवत आहेत.