
करौली. राजस्थानच्या करौली जिल्ह्यात २ दिवसांपूर्वी कैलादेवी मातेचे दर्शन करून परतणाऱ्या पती-पत्नीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आता या प्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. यामध्ये पोलिसांनी मृत तरुणाची आईसह एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. ज्यांची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.
करौलीचे एसपी बृजेश ज्योती उपाध्याय यांनी सांगितले की, विकास आणि दीक्षाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घटनेनंतर वेगवेगळ्या टीमची स्थापना करण्यात आली. टीमने राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. ज्याच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणी मृत तरुण विकासची आई ललिता, मामा रामबरन आणि मामाकडे काम करणारा तरुण चमन यांना अटक केली आहे.
पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, विकास आणि दीक्षाचे लग्न ९ महिन्यांपूर्वी झाले होते, परंतु त्या दोघांचेही गावातच इतर लोकांसोबत अनैतिक संबंध सुरू होते. विकासची आई ललिताला याची माहिती मिळाली होती. विकासची एक चुलत बहीण देखील कोणाबरोबर तरी पळून गेली होती. त्यामुळे विकासची आई ललिताला आपल्या मुलाची आणि सुनेची बदनामी होण्याची भीती होती.
म्हणून तिने आपला भाऊ रामबरन आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या चमनसोबत कट रचला. दीक्षा आणि विकासचा कैलादेवीला येण्याचा कार्यक्रम बऱ्याच दिवसांपासून ठरला होता. अशात विकासची आईसह तिघा आरोपींनी जवळपास एक महिना कट रचला आणि त्यानंतर राजस्थानमध्ये त्यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले होते.