
पश्चिम आशियातील काही भागांमध्ये हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांच्या मदतीसाठी भारतीय दूतावास पुढे सरसावले आहेत.
कुवेतमधील भारतीय दूतावासाने 'X' वर एक पोस्ट करून याबद्दल माहिती दिली. त्यांनी म्हटलं आहे की, “हवाई वाहतूक बंद झाल्यामुळे कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांना मदत करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. दूतावासाचे अधिकारी या प्रवाशांच्या सतत संपर्कात आहेत. तसेच, कुवेतचे अधिकारी, हॉटेल्स आणि एअरलाइन्सच्या व्यवस्थापनाशीही आम्ही जवळून समन्वय साधत आहोत.”
दरम्यान, अबू धाबीची विमान कंपनी इतिहाद एअरवेजने एक मोठी घोषणा केली आहे. बुधवार, ४ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत (UAE वेळेनुसार) अबू धाबीला येणारी आणि जाणारी सर्व व्यावसायिक विमानं रद्द करण्यात आली आहेत.
एअरलाइनने सांगितलं की, UAE अधिकाऱ्यांच्या परवानगीने आणि सुरक्षेची खात्री करून काही कार्गो आणि प्रवाशांना परत आणणारी विमानं चालवली जाऊ शकतात.
"इतिहादकडून थेट संपर्क साधल्याशिवाय प्रवाशांनी विमानतळावर येऊ नये," असं आवाहन कंपनीने केलं आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी कंपनीच्या वेबसाइटवर फ्लाइटचं स्टेटस तपासावं आणि बुकिंगमधील संपर्क तपशील अपडेट ठेवावा, असंही सांगण्यात आलं आहे.
ज्या प्रवाशांनी २८ फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी तिकीट बुक केलं आहे आणि त्यांचा प्रवास ७ मार्चपर्यंत आहे, ते १८ मार्चपर्यंत इतिहादच्या विमानांमध्ये मोफत रीबुकिंग करू शकतात. बाधित प्रवाशांना रिफंडचा पर्यायही देण्यात आला आहे.
इकडे, बजेट एअरलाइन असलेल्या स्पाईसजेटनेही हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे UAE मधून येणारी-जाणारी अनेक विमानं रद्द झाल्याची माहिती दिली आहे.
अकासा एअरने एका वेगळ्या निवेदनात म्हटलं आहे की, सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर ३ आणि ४ मार्च रोजी जेद्दाहसाठी काही निवडक विमानं चालवली जातील.
कंपनीने मुंबई ते जेद्दाह आणि अहमदाबाद ते जेद्दाह या सेवा विशिष्ट तारखांना सुरू राहतील, असं जाहीर केलं आहे. मात्र, ही विमानसेवा त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असंही स्पष्ट केलं आहे.
पण, अबू धाबी, दोहा, कुवेत आणि रियाधला जाणारी-येणारी विमानं ४ मार्चपर्यंत बंदच राहतील, असं अकासा एअरने सांगितलं आहे.
"आमच्या प्रवाशांची आणि क्रूची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असं सांगत कंपनीने प्रवाशांना विमानतळाकडे निघण्यापूर्वी फ्लाइटचं स्टेटस तपासण्याचं आवाहन केलं आहे.
प्रवाशांना दिलासा देण्यासाठी, सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने 'X' वर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, अडकलेल्या प्रवाशांना भारतात परत आणण्यासाठी इंडिगो एअरलाइन्स जेद्दाहहून विशेष विमानं चालवणार आहे.
दूतावासाने म्हटलं आहे की, "इंडिगो एअरलाइन्स जेद्दाहहून भारतासाठी विशेष विमानं उडवणार आहे."
आखाती प्रदेशातील बदलत्या परिस्थितीवर अधिकारी आणि एअरलाइन्स कंपन्या सतत लक्ष ठेवून आहेत. सुरक्षेचा आढावा घेऊनच हळूहळू विमानसेवा पूर्ववत केली जात आहे.